अवयवदानाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सेवा फाऊंडेशन या संस्थेद्वारे दादरच्या शिशू विहार माध्यमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
'अवयवदान एक वरदान' या थीम अंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अवयवदानामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळतं हे जरी माहित असलं, तरी सहजासहजी लोक अवयवदान करायला पुढाकार घेत नाहीत. त्यामुळेच शिशू विहार शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये अवयवदानाचं महत्त्व पटवून सांगण्यासाठी 'अवयवदान एक वरदान' या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
या कार्यक्रमात सातवी ते दहावी इयत्तेतील 400 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. शिवाय, कृत्रिम पद्धतीनं अवयव तयार करून विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आले होते. केईएम रुग्णालयातील रोटोच्या समन्वयक डॉ. कामाक्षी भाटे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
मृत्यूनंतर अवयवदानामुळं सहा जणांचे प्राण वाचवता येऊ शकतात. याबाबत लोकांमध्ये जागरूकता कमी आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतरही त्याचे अवयव इतरांच्या शरीरात जिवंत राहतात. तसंच, अवयवदानाचा विषय समजून घेऊन तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा.
डॉ. कामाक्षी भाटे, रोटो समन्वयक, केईएम रुग्णालय
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अवयव निकामी होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत दात्यांची संख्या अपुरी पडते. अवयव मिळत नसल्यानं आजही अनेक रुग्ण प्रतीक्षेत आहेत. विद्यार्थ्यांना अवयवदानाचं महत्त्व पटवून देणं, हा यामागील मुख्य उद्देश आहे. इतकंच नाही, तर या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अवयवदान करण्याबाबत प्रतिज्ञाही घेतली असल्याचं सेवा फाऊंडेशन या संस्थेचे सदस्य विकास वराडकर यांनी सांगितलं.