कोरोना विषाणूचं (coronavirus) संक्रमण वेगाने फैलावत असताना त्यापासून बचावासाठी आवश्यक असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेगही वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यासाठी मुंबईत २२७ वाॅर्डांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्यात यावं, अशी सूचना राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिकेला केली आहे.
मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते बुधवारी एक्वर्थ महापालिका रूग्णालयातील, वडाळा इथं लसीकरण केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. या लसीकरण केंद्रात दिवसाला ४०० लोकांचं लसीकरण केलं जाईल.
तर वरळी कोळीवाडा इथं नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. या केंद्रात दररोज ३०० ते ४०० लोकांचं लसीकरण केलं जाईल.
यावेळी आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी मुंबईतील सर्व २२७ वाॅर्डांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याची सूचना केली. जेणेकरून १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी सुरू होणाऱ्या लसीकरणाचा जास्तीत जास्त फायदा जनतेला मिळू शकेल आणि लसीकरणालाही वेग देता येईल. सध्याच्या स्थितीत उपलब्ध असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रांची संख्या दुपटीने वाढवून खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यासाठीही परवानगी देण्यात येईल, असं महापालिकेने स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा- तर, महाराष्ट्रात मोठं संकट निर्माण होईल, नवाब मलिक यांची भीती
येत्या काही दिवसांत ८० लाख प्रौढांचं लसीकरण करण्याचं उद्दीष्ट्य मुंबई महापालिकेने (bmc) समोर ठेवलं आहे. त्यासाठी महापालिकेला किमान १.६ कोटी कोरोना लशींची आवश्यकता आहे. सोबतच मुंबईतील २४ वाॅर्डातील किमान ४ सरकारी रुग्णालयांत लसीकरण केंद्र सुरू करण्याची देखील महापालिकेची योजना आहे.
सद्यस्थितीत मुंबईत ७३ खासगी, ३९ महापालिका आणि १७ राज्य सरकारची रुग्णालयं अशा १३० ठिकाणी लसीकरण सुरू आहे. महापालिकेने जवळपास २.७६ लाख लोकांना लशीचे दोन्ही डोस दिले असून १७.६६ लाख लोकांना आतापर्यंत लशीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे.
मुंबईत (mumbai) कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या हळुहळू वाढवण्यात येत असली, तरी कोरोना लशीचा पुरवठा मात्र अजूनही पुरेशा प्रमाणात होत नाहीय. मंगळवार २० एप्रिल रोजी शहरातील ६ महापालिका, ५ राज्य सरकार आणि ३८ खासगी रुग्णालयातील कोरोना केंद्र लशीअभावी बंद ठेवण्यात आली होती.
केंद्र सरकारने राज्यांना लस उत्पादक कंपन्यांकडून थेट लस खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार जोपर्यंत राज्य सरकारकडे लशीचा पुरेसा साठा येत नाही, तोपर्यंत मुंबईसह राज्यातील लशीचा तुटवडा भरून निघणार नाही, अशीच आपल्याकडील परिस्थिती आहे.
(aaditya thackeray directs bmc to open covid 19 vaccination centres across all 227 wards in mumbai)