महाराष्ट्रात शुक्रवार ते मंगळवार अशा मागील ५ दिवसांत १८३९ पक्षांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाला आहे. मुंबई, दापोली, परभणी, लातूर या जिल्ह्यांसहीत एकूण १६ जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव दिसून आल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
राज्यातील ‘बर्ड फ्लू’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सचिंद्र प्रताप सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत २००, अमरावती जिल्ह्यात ११ आणि अकोला जिल्ह्यात ३ कोंबड्या आणि ४ कावळे असे २१४ पक्षी मंगळवारी दगावले. अकोला जिल्ह्यात ४ कावळेही मृतावस्थेत आढळले आहेत. संबंधित नमुने तपासणीसाठी भोपाळ तसंच पुण्यात पाठवण्यात आले आहेत.
आतापर्यंत यवतमाळ, अकोला, अमरावती, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, बीड, परभणी, लातर, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, नाशिक, नांदेड, सातारा आणि अहमदनगर अशा १६ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूने हातपाय पसरले आहेत.
हेही वाचा- Bird Flu: अंडी-चिकन खाणाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला!
परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर बर्ड फ्लूची लागण इतर पक्ष्यांना होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने गावाच्या १ किमी परिसरातील कोंबड्यांचं कलिंग करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जवळपास ५५०० कोंबड्यांचं कलिंग होणार आहे.
घोडबंदर येथील वाघबीळ भागात मृतावस्थेत आढळलेल्या १५ पैकी ३ बगळे आणि एका पोपटाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आलं आहे. ठाणे शहरात १२१ पक्षी मृतावस्थेत आढळून असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे.
दरम्यान, अंडी किंवा कोंबडीचं मांस अर्धा तास विशिष्ट तापमाणावर शिजवल्यानंतर त्यातील जीवाणू मरून जातात, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे चिकन किंवा अंड्याचे पदार्थ खाणाऱ्यांनी हे पदार्थ ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून नंतरच खावेत. जेणेकरून कुठल्याही प्रकारचा धोका राहणार नाही, असं आवाहन राज्याचे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.
हेही वाचा- मुंबईत चिकनच्या किंमतीत १० ते २० रुपयांची घसरण