Advertisement

मुंबईत रुग्णांची संख्या लाखांमध्ये वाढण्याची माहिती अतिरंजीत, महापालिकेचं स्पष्टीकरण

मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी ही मे महिन्याच्या मध्यापर्यंत काही लाखांमध्ये पोहोचेल, अशा आशयाच्या बातम्या बुधवारी प्रसारमाध्यमातून केंद्रीय पथकाच्या हवाल्याने प्रकाशित झाल्या आहेत. यावर पालिकेने लेखी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबईत रुग्णांची संख्या लाखांमध्ये वाढण्याची माहिती अतिरंजीत, महापालिकेचं स्पष्टीकरण
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मे महिन्याच्या मध्यापर्यंत काही लाखांमध्ये पोहोचेल, अशा आशयाच्या बातम्या विविध माध्यमातून केंद्रीय पथकाच्या हवाल्याने प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, ही माहिती वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी, अतिरंजित असून दिशाभूल करणारी आहे. अशा प्रकारचे कोणतेही प्रत्यक्ष वा सूचक वक्तव्य केंद्रीय पथकाने महापालिका आयुक्तांकडे किंवा अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे अथवा इतर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेलं नाही. याउलट या पथकाने पालिकेच्या प्रयत्नांचे सकारात्मकरित्या कौतुक केलं, असं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी ही मे महिन्याच्या मध्यापर्यंत काही लाखांमध्ये पोहोचेल, अशा आशयाच्या बातम्या बुधवारी प्रसारमाध्यमातून केंद्रीय पथकाच्या हवाल्याने प्रकाशित झाल्या आहेत. यावर पालिकेने लेखी स्पष्टीकरण दिलं आहे. पालिकेने म्हटलं की, सदर केंद्रीय पथकाने आपल्या अभ्यास दौऱ्यादरम्यान मुंबई महापालिका आयुक्त यांच्यासह महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. मुंबई महापालिका क्षेत्रातील परिस्थिती आणि त्या अनुषंगाने महापालिका करत असलेल्या उपाययोजना याविषयीची माहिती घेतली. सर्व बाबी लक्षात घेता, विविध माध्यमातील या बातम्या वस्तुस्थितीचा विपर्यास करणाऱ्या असून अतिरंजित व दिशाभूल करणाऱ्या आहेत.

मुंबईत ११ ते २१ मार्च २०२० यादरम्यान ३ हजार ४४५ व्यक्तींना करोनाची लागण झाली असून यापैकी ४२५ पेक्षा अधिक रुग्ण आजवर बरे होऊन घरी गेले आहेत. यापैकी बहुतांश रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधोपचार करण्यात आले, ही बाब या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यायला हवी. तसेच २ हजार ८८२ रुग्ण सध्या पालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून यापैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांची प्रकृती स्थिर आहे व त्यांना धोका नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आकडेवारी लक्षात घेतल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण व वाढीचे प्रमाण आटोक्यात आहे. केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार मुंबई महानगरपालिकेद्वारे आवश्यक ती सर्व कार्यवाही काटेकोरपणे अमलात आणली जात आहे. ज्यामुळे संसर्गास प्रतिबंध होण्यास देखील मोठी मदत होत आहे.

सर्व बाबी लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे प्रसारमाध्यमांना नम्र विनंती करण्यात येते की, त्यांनी याप्रकारची अतिरंजित माहिती प्रकाशित करण्याचे लोकहितास्तव टाळावे. त्याचबरोबर नागरिकांनाही आवाहन करण्यात येते की, त्यांनी केंद्र शासन, राज्य शासन व मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात आणि 'कोरोना कोविड 19' विरोधात सुरू असलेल्या लढाईला बळ द्यावे.



हेही वाचा -

अर्णब गोस्वामी यांच्यावर हल्ला, काँग्रेसवर केले गंभीर आरोप

दिलासादायक बातमी, ९ कंटेनमेंट झोनमध्ये एकही नवीन रुग्ण नाही




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा