Advertisement

महाराष्ट्रात पुरेशा कोरोना चाचण्या होत नाहीत; केंद्राचा पुन्हा ठपका

महाराष्ट्रात कोरोना चाचण्या पुरेशा प्रमाणात होत नसल्याचं म्हणत केंद्राने पुन्हा एकदा राज्यावर ठपका ठेवला आहे.

महाराष्ट्रात पुरेशा कोरोना चाचण्या होत नाहीत; केंद्राचा पुन्हा ठपका
SHARES

महाराष्ट्रात कोरोना (coronavirus) चाचण्या पुरेशा प्रमाणात होत नसल्याचं म्हणत केंद्राने पुन्हा एकदा राज्यावर ठपका ठेवला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात कमी चाचण्या होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तत्पूर्वी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पाठवलेल्या पत्रात देखील हेच मत व्यक्त केलं होतं.

केंद्रीय आरोग्य पथकाकडून महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांतील परिस्थितीची पाहणी सातत्याने केली जात असून त्यासंदर्भातील अहवाल रोजच्या रोज केंद्र व राज्य सरकारला दिला जात आहे. तसंच या पथकाकडून जिल्हा आरोग्य यंत्रणेला आवश्यकतेनुसार सूचना आणि सल्ला दिला जात आहे. 

चाचण्यांची कमतरता

याबाबत माहिती देताना राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं आहे की, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ही ५७ हजारांवर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्रात आरटी-पीसीआर चाचण्यांमध्येही कमतरता दिसून येत आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात ५७ टक्के आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. फेब्रुवारी महिन्यात हाच आकडा ७०.३ टक्क्यांच्या आसपास होता. आरटी-पीसीआर आणि कोरोना चाचण्या या दोन्ही महत्त्वाच्या आहेत, महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या हळूहळू वाढत असली, तरी पुरेशी नाही, असं भूषण यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा- भाजप नेत्यांच्या मागण्या फक्त राजकारणासाठी, नवाब मलिकांचा टोला

प्रशासकीय यंत्रणेत त्रुटी

कोरोनाबाबतच नियोजन करण्यात प्रशासकीय यंत्रणांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे एका बाजूला कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी पुरेशा प्रमाणात आरोग्य व्यवस्था सज्ज असलेली दिसून येत नाही. केंद्राच्या आरोग्य पथकाने भेट दिलेल्या एकाही जिल्ह्यामध्ये कोरोनासंदर्भातील नियमांचं काटेकोरपणे पालन होत असल्याचं आढळून आलेलं नाही. एकूणच कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास राज्य सरकार कमी पडत असल्याचं मत राजेश भूषण यांनी व्यक्त केलं आहे.

कडक लाॅकडाऊन

दरम्यान कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र (maharashtra) सरकारने सातत्याने कडक निर्बंध लागू करूनही जनता या निर्बंधांचं पालन करताना दिसून येत नाही. सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठांमध्ये अजूनही गर्दी दिसून येत आहे. परिणामी राज्यात कडक लाॅकडाऊन लावण्याच्या दिशेने राज्य सरकारने पावलं उचलली असून त्यासंदर्भातील घोषणा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. 

(central blames low RT PCR test in maharashtra)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा