मुंबई महानगरपालिकेचा वयस्कर, अंध आणि दिव्यांग व्यक्तींना घरोघरी जाऊन लस देण्याचा प्रस्ताव मोदी सरकारनं फेटाळला आहे. केंद्र सरकारचं घरोघरी म्हणजेच डोअर टू डोअर जाऊन लस देण्यासंदर्भात कोणतही धोरण नसल्याचं मुंबई मिररनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त सचिव (आरोग्य) सुरेश काकानी यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, जवळपास दीड लाख लोके मुंबईमध्ये असे आहेत, जे अंथरुणाला खिळून आहेत किंवा अपंग आहेत. लस घेण्यासाठी हे लोक लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ शकत नाही. याच लोकांना घरी जाऊन लस देण्यासंदर्भात केंद्राकडे परवानगी मागितली होती. पण केंद्राचं असं कोणतंही धोरण नसल्याचं केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं. ही परवानगी जर मिळाली असती तर या लोकांना नक्कीच फायदा झाला असता.
मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून अंधेरी पश्चिमेचे भाजपा खासदार अमीत साटम यांनाही झोपडपट्ट्यांमध्ये लसीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं म्हटलं होतं.
१०० किंवा त्याहून अधिक नागरिकांना फायदा होईल या दृष्टीनं महानगरपालिकेनं घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भातील मोहीम राबवावी, अशी मागणी साटम यांनीही केली होती. या अशा मोहिमेला चेन्नईमध्ये चांगले यश मिळाल्याचे त्यांनी म्हटलं होतं.
तळागाळातील लोकांपर्यंत लस पोहचवण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष योजना तयार केली आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. लसीकरणासंदर्भात अनेकांना भीती वाटत असली, तरी ते रुग्णालयांमध्ये जाऊन लस घेत आहेत.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येईल त्या माध्यमातून लसीकरण करणे. अनेक देशांनी अशीच लसीकरण मोहीम राबवली असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
दारोदारी जाऊन लसीकरण करण्याची मोहीम यशस्वी का होणार नाही यासंदर्भात देखील या अधिकाऱ्यानं माहिती दिली. तो म्हणाला की, एखाद्याचे तुम्ही लसीकरण केल्यानंतर त्या व्यक्तीवर लसीचा काही दुष्परिणाम होतो आहे का? हे पाहणं गरजेचं आहे. घरोघरी जाऊन लस दिल्या तर एका व्यक्तीला लस देण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. या पद्धतीनं लसीकरण मोहिमेचा वेग मंदावेल.
दरम्यान, मुंबईत वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवरुन केंद्र सरकारनं चिंता व्यक्त केली आहे. सध्या कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता लवकरच मुंबईमध्ये दिवसाला १० हजार कोरोनाबाधित सापडतील अशी भीती या अधिकाऱ्यानं व्यक्त केली आहे.
हेही वाचा