राज्यात कंटेनमेंट कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने कोरोना रुग्णांच्या दुपटीच्या दराचा वेग २ दिवसांवरून ६ दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब असेल, असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना आरोग्यमंत्री टोपे यांनी ही माहिती दिली.
राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाबाधितांच्या सद्यस्थितीची माहिती देताना सांगितलं की, राज्याचा कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग हा आधी २ दिवस होता. तो नंतर ३ झाला आणि आता सुमारे ६ दिवस एवढा झाला आहे. हा दुपटीचा कालावधी जेवढा वाढेल, तेवढी रुग्णसंख्या कमी होईल.
हेही वाचा - राज्यात २८६ नवे करोनाग्रस्त; रुग्णसंख्या ३२०२ वर
मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न
राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देशात जास्त आहे. ही बाब खरी असली, तरी त्यातील ८३ टक्के मृत्यू हे रुग्णाला पूर्वीपासून जडलेल्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडचा विकार यामुळे झाले आहेत. काहीही असलं तरी कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णासाठी तातडीचा वैद्यकीय सल्ला दिला जाईल. त्यासाठी समितीतील तज्ञांचे संपर्क क्रमांक राज्यभरातील रुग्णालयांना कळविण्यात आले आहेत
कोरोना चाचण्या वाढल्या
राज्यात आतापर्यंत झालेल्या ५१ हजार चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या या एकट्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. एकूण झालेल्या चाचण्यांपैकी अडीच टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात सध्या शासकीय २१ आणि खासगी १५ चाचणी प्रयोगशाळा आहेत त्यात अजून ६ प्रयोगशाळांची भर पडून ही संख्या ३६ होईल. पूल टेस्टींग, रॅपिड टेस्टिंगसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) परवानगी मागितली आहे.
हेही वाचा - Coronavirus Updates: धारावीत आढळले नवे २६ कोरोनाग्रस्त
बरे होणाऱ्यांची संख्याही वाढतेय
राज्यात सध्या ३०० कोरोनाबाधित बरे झाले आहेत. त्यांच्यातील रक्तद्राव (प्लाझ्मा) काढून कोरोना बाधित रुग्णांना ते देऊन त्यांच्यातील अँटीबॉडीज वाढविण्याच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही आयसीएमआरकडे परवानगी मागितली आहे.
केंद्र शासनाकडे राज्याने ८ लाख एन-९५ मास्कची मागणी केली असू त्यापैकी १ लाख मास्क उपलब्ध झाले आहेत. सुमारे ३० हजार पीपीई किट उपलब्ध झाले आहेत.
दिल्ली येथे मरकजसाठी राज्यातील जे तबलिगी बांधव गेले होते त्यातील सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं असून त्यांच्या चाचण्याही करण्यात आल्या आहेत. त्यातील ५० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
अत्यावश्यक सेवा, शेती याबाबत टाळेबंदीत शिथिलता आणण्याबाबत केंद्र शासनाकडून ज्या सूचना दिल्या जातील, त्याचे पालन केले जाईल. २० एप्रिलनंतर परिस्थिती पाहून टाळेबंदीमध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही राजेश टोपे म्हणाले.