मुंबईतील धारावी परिसरातील रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत गुरुवारी नवीन २६ रुग्ण आढळल्याची माहिती मिळते. त्यामुळं आता धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८६ वर गेली आहे. तसंच, आतापर्यंत ९ जणांचा बळी गेला आहे. धारावीत रहिवाशांचा बेशिस्त वावर सुरूच असल्यानं रुग्णांचा आकडा दर दिवशी वाढतो आहे.
मुंबईत करोनाचा संसर्ग वाढल्यास धारावी झोपडपट्टीत त्याचा उद्रेक होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. येथील लोकवस्ती पाहता तो आवरणे यंत्रणांना कठीण जाणार आहे. त्यामुळं सगळ्या सरकारी यंत्रणेचं लक्ष आता धारावीकडं लागलं आहे. धारावीसाठी विशेष कृती आराखडाही तयार करण्यात आला असून प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जात आहे.
तपासणी कठोर केल्याने दर दिवशी इथं रुग्णांचा आकडा वाढतच आहे. गुरुवारी २६ नवीन रुग्ण सापडल्यामुळं धोका काहीसा वाढला आहे. धारावीत गुरुवारी सापडलेल्या २६ रुग्णांमध्ये २० पुरुष आहेत. मुस्लिम नगर भागातच ११ रुग्ण आढळले असून आधीच प्रतिबंधित असलेल्या मुकुंद नगर मध्ये ४ जण सापडले आहेत. साईराज नगर, रामजी चाळ, सोशल नगर इथेही रुग्ण सापडले आहेत.
पालिकेच्या जी उत्तर विभागानं धारावीसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार केला आहे. धारावी परिसरात एकही रुग्ण आढळला की त्याच्या संपर्कातील लोकांचे विलगीकरण केलं जातं. धारावीत संसर्ग वाढू नये म्हणून राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथं तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात या लोकांना ठेवले जात आहे.
धारावीत टप्याटप्यानं तपासणी आणि वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळं हे रुग्ण ठराविक भागात आढळून आले आहेत. धारावीत १० लाख लोक राहत असून त्यांच्यापर्यंत हा संसर्ग पोहोचू नये म्हणून येत्या काळात मोठ्या प्रमाणावर विलगीकरण कक्ष या भागात उभारावे लागणार आहेत.
हेही वाचा -
राज्यात २८६ नवे करोनाग्रस्त; रुग्णसंख्या ३२०२ वर
मार्वे : समुद्रात बोट बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या दोघांचे मृतदेह सापडले