मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून अनेक रूग्णांचा मृत्यूही होत आहे. मुंबईत आतापर्यंत ४६२९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील वाढत्या मृत्यूचा आकडा चिंताजनक आहे. मुंबईच्या २० वॉर्डातील मृत्यूदर देशाच्या तुलनेत जास्त असल्याची बाब समोर आली आहे.
मुंबईचा एकूण सरासरी मृत्यूदर ५.७ टक्क्यांच्या आसपास आहे. मात्र, अनेक भागांमध्ये १० टक्क्यांच्या आसपास मृत्यूदर असल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील १३ वॉर्डमधील मृत्यूदर मुंबईच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. चेंबूर-गोवंडी या भागात सर्वाधिक १० टक्के मृत्यूदर आहे. पालिकेच्या साथ सर्वेक्षण विभागाने जाहीर केलेल्या विभागवार आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.
देशाचा मृत्यूदर ३ टक्के आणि राज्याचा मृत्यूदर ४.५ टक्के आहे.. पालिकेच्या २४ वॉर्डापैकी २० वॉर्डाचा मृत्यूदर देशाच्या मृत्यूदरापेक्षाही अधिक आहे. दहिसर, मालाड, कांदिवली, मुलुंड, कुलाबा या भागांतील मृत्यूदर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. इतर सर्व भागांमध्ये मृत्यूदर ३ टक्क्यांच्या वर आहे. अंधेरी पूर्व, दादर, माहीम, धारावी, भांडुप, कुर्ला, वरळी, वांद्रे पूर्व, शीव-वडाळा, भायखळा, देवनार-मानखुर्द, गोरेगाव, चेंबूर-गोवंडी, वांद्रे पश्चिम, मशीद बंदर सर्व भागांत मृत्यूदर खूप जास्त आहे.
चेंबूर, गोवंडी पाठोपाठ वांद्रे पूर्वमध्ये ८.७ टक्के आणि डोंगरी, मशीद बंदर भागात ८.१६ टक्के इतका मृत्यूदर आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे दीर्घ आजार हेच मृत्यूदर जास्त असण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचे मत विभाग अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.