कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात कोरोनाबाधितांची वाढती मृत्यूसंख्याही चिंताजनक ठरू लागली आहे. शनिवारी शहरातील कोरोना मृत्यूने अखेर शंभरी (death toll due to coronavirus crossed the 100 mark in kalyan dombivli) गाठली आहे.
करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली शहरांचे प्रशासकीय प्रमुख आणि पोलीस प्रमुखांबरोबर बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली शहरांमधील अतिसंवेदनशील क्षेत्रांत २९ जूनपासून संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याची तयारी स्थानिक प्रशासनाने सुरू केली आहे.
मागील २४ तासांत कोरोनाच्या संसर्गाने ५ जणांचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा थेट १०१ वर जाऊन पोहोचला आहे. तर शहरांत मागील २४ तासांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच ४३६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून ५,३०९ वर जाऊन पोहोचली आहे.
हेही वाचा - कल्याण-डोंबिवलीत पुन्हा 'या' भागात लॉकडाऊन
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. २७ जुन २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! pic.twitter.com/WVOZqKuj5V
— Kalyan Dombivli Municipal Corporation (@KDMCOfficial) June 27, 2020
कल्याण-डोंबिवली शहरासोबतच एकूण राज्यभरात देखील मागील २४ तासांत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही तासांत राज्यभरात ठिकठिकाणी ५,३१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढून १,५९,१३३ वर गेला आहेत. तर १६७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ८६ कोरोनाबाधितांचे मृत्यू हे मागील ४८ तासांत तर ८१ त्याआधी झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
कल्याण-डोंबिवली शहरात सद्यस्थितीत ३०७९ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत असून २१२९ रुग्णांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज घेत घरी सोडण्यात आलं आहे.
हेही वाचा - ठाण्यात शुक्रवारी सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद