गेल्या काही वर्षात मुंबईसह देशभर टेलिफोनिक कन्स्लटेशन अर्थात डाॅक्टरांकडून फोन, व्हाॅटसअपवरून औषध लिहून घेणं वा मेडीकलमध्ये जाऊन डाॅक्टरांना फोन लावून देत औषध घेणं असे प्रकार वाढले आहेत. टेलिफोनिक कन्स्लटेशन हे कायद्याच्या चौकटीत तर बसत नाहीच, पण त्याचवेळी हा प्रकार रूग्णाच्या जीवावर बेतत असल्याचंही समोर आलं आहे.
त्यामुळं आता डाॅक्टरांनी इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए) च्या माध्यमातून नो टेलिफोनिक कन्स्लटेशन म्हणत यापुढं फोन वा व्हाॅटसअपद्वारे आजाराचं निदान करत औषध न सांगण्याचा एेतिहासिक निर्णय घेतल्याची माहिती आयएमएचे सचिव डाॅ. पार्थिव सांघवी यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.
कायद्याचं काटेकोर पालन आणि रूग्णांची सुरक्षितता यादृष्टीनं आयएमएनं हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईसह देशभरातील ३ लाखांहून अधिक डाॅक्टरांमध्ये यासंंबंधीची जनजागृती सोशल मिडीया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून केली जात असल्याचंही डाॅ. सांघवी यांनी स्पष्ट केलं आहे. तर डाॅक्टरांबरोबरच रूग्णांमध्ये, नागरिकांमध्येही जनजागृती करत टेलिफोनिक कन्स्लटेशन करू नये असं आवाहन करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आयएमएचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा, स्वागतार्ह मानला जात असून या निर्णयाचं आता सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. डाॅ. दिपा पावसकर आणि डाॅ. संदिप पावसकर यांच्याविरोधात नुकताच हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल झाला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. रूग्णाला फोनवरून औषध दिली नि परिणामी रूग्णाची प्रकृती खालावून रूग्णाचा मृत्यू झाल्याचं हे प्रकरण आहे. या प्रकरणाच्या धर्तीवर आयएमएनं हा निर्णय घेतला आहे.
किरकोळ आजारांसाठी बऱ्याचदा आपण प्रत्यक्षात डाॅक्टरांकडं जाण्यास टाळाटाळ करतो. त्याएेवजी डाॅक्टरांशी फोनवरून औषध लिहून घेतो नि ती केमिस्टकडून आणतो. नाही तर केमिस्टकडे जाऊन डाॅक्टरांनो फोन लावून फोन केमिस्टच्या हातात टेकवतो. एकूणच काय तर डाॅक्टरांकडे न जाता कन्स्लटेशन न करता औषध घेतो. मुळात हा प्रकार कायद्याच्यादृष्टीनं चुकीचा असून या प्रकारामुळं अनेकदा चुकीच्या निदानामुळं वा औषधांमुळं रूग्णांच्या जीवावर बेततं.
काही रूग्ण याचा गैरफायदा घेत हवी ती नशेसाठीची, झोपेसाठीची औषधही सहज उपलब्ध करून घेतात. एक तर डाॅक्टरांची फी वाचवणं, वेळ वाचवणं यासारखी कारणं टेलिफोनिक कन्स्लटेशनमध्ये असतातच. पण त्याचवेळी डाॅक्टरांकडे वेळेत पोहचू न शकणं यासारख्या अडचणी असतात. पण हे असं टेलिफोनिक कन्स्लटेशन जीवावर बेतू शकतं.
रूग्ण डाॅक्टरांना आपल्या जे काही जावणतं, जो त्रास होतो तो सांगतो. पण डाॅक्टरांनी रूग्णाला प्रत्यक्ष तपासलंच नसल्यानं आजाराचं योग्य निदान होत नाही. त्यामुळं चुकीची औषधं दिली जाऊ शकतात वा स्पेलिंग मिस्टेकमुळं चुकीची औषधं घेतली जाऊ शकतात. हे रूग्णाच्या जीवावर बेतल्यास डाॅक्टर त्यात दोषी ठरू शकतात. त्यामुळं आता आयएमएनं नो टेलिफोनिक कन्स्लटेशन म्हणत फक्त आणि फक्त क्लिनिकमध्येच येऊन रूग्णांची तपासणी करून त्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व डाॅक्टरांना यासंबंधीच्या सुचना करण्यात आल्याचं डाॅ. सांघवी यांनी सांगितलं आहे.
टेलिफोनिक कन्स्लटेशनचा सर्वाधिक फटका आणि त्रास होतो तो फार्मासिस्ट अाणि औषध विक्रेत्यांना. रूग्ण-नातेवाईक येतात नि आमच्या डाॅक्टरांशी बोला असं म्हणत फोन हातात देतात. मग समोरून डाॅक्टर औषधं सांगतात. अशावेळी ती व्यक्ती डाॅक्टरच आहे का हा प्रश्नच असतोच. पण रूग्णाची तपासणी झाली की नाही झाली हे माहीत नसल्यानं औषध विक्रेत्यांचीही अडचण होते. चुकीची औषध दिली गेली तर रूग्णांचा जीव गेल्यास त्यांच्यावर कारवाईची भिती असतेच.
त्यातही औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध देणं बंधनकारक असल्यानं फोनवरून औषध देत असल्याचं सिद्ध झाल्यास औषध विक्रेते-फार्मासिस्टला हे महागात पडू शकतं, अन्न आणि औषध प्रशासनाकडून कडक कारवाई होऊ शकते. पण आता आयएमएच्या या निर्णयामुळं आम्हालाही दिलासा मिळाला असून हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया फार्मासिस्ट आणि औषध विक्रेते शशांक म्हात्रे यांनी दिली आहे.
हेही वाचा -
रेल्वेत सापडलेल्या बाळाचं कामा रुग्णालयात बारसं
केमोथेरपीशिवाय स्तनाचा कर्करोग होणार बरा