Advertisement

डॉ. तात्याराव लहाने शासकीय सेवेतून निवृत्त

अंधांना दृष्टी देण्यासाठी गेली अनेक वर्षे झगडत असलेले तात्याराव लहाने आपल्या आरोग्यसेवेसाठी देशभरात ओळखले जातात. त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारासह ५०० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

डॉ. तात्याराव लहाने शासकीय सेवेतून निवृत्त
SHARES

ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. गेली ३६ वर्ष ते शासकीय सेवेत होते. अंधांना दृष्टी देण्यासाठी गेली अनेक वर्षे झगडत असलेले तात्याराव लहाने आपल्या आरोग्यसेवेसाठी देशभरात ओळखले जातात. त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारासह ५०० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

‘मी संचालक या पदावरून आज निवृत्त होत आहे, परंतु पुढील काळात माझे अंधत्व नियंत्रणाचे व नेत्र रुग्णांच्या शस्त्रक्रियेचे काम हे नेहमीसाठी सुरू राहील’, अशी माहिती तात्याराव लहाने यांनी दिली आहे. ‘या ३६ वर्षाच्या कालावधीत हजारो मित्र भेटले, अनेक लोकांची मदत झाली. त्या सर्वांचा नामाउल्लेख करणे शक्य नाही पण त्या सर्वांचा ऋणी आहे. त्या सर्वांचे प्रेम मिळणारा मी एक अतिशय नशिबवान डॉक्टर स्वत:ला समजतो. हे आपले प्रेम कायम ठेवावे अशी आपल्याकडे प्रार्थना करतो’, असे भावनिक उद्गारही यावेळी डॉ. लहाने यांनी काढले आहेत.

डॉ. तात्याराव लहाने यांनी आपल्या निवृत्तीची माहिती देताना एक पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केला आहे. ‘१७ मे १९८५ रोजी मी अधिव्याखाता म्हणून अंबाजोगाई जि. बीड येथे सेवेत रुजू झालो होतो. अंबाजोगाई येथे असतानाच अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मी नेत्रशिबिरांना सुरुवात केली होती. बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागांत जाऊन अंधत्व आलेल्यांना दृष्टी देण्याचे काम आठ वर्ष केले. त्यानंतर धुळे येथील नवीनच स्थापित झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आक्टोबर १९९३ ते जुलै १९९४ असे नऊ महिने काम केले. तेथेही आदिवासी व दुर्गम भागांत जाऊन नेत्रशस्त्रक्रिया केल्या. पण किडनीच्या आजार बळावल्याने मी मुंबई येथे सर जेजे रुग्णालयात जुलै १९९४ ला रूजू झालो. 

दर गुरुवारी माझे डायलिसीस सुरू झाले. मी येथे आल्यानंतर नवनवीन तंत्रज्ञान शिकून घेण्यास सुरुवात केली. पुढे माझा किडनीचा आजार बळावला. किडनी बदलावी लागणार होती. माझी आई (माय) अंजनाबाईने स्वत:ची किडनी देऊन फेब्रुवारी १९९५ ला मला दुसरा जन्म दिला. मायीच्या या दातृत्वाने प्रेरीत होऊन मी सामाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला,’ असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.



हेही वाचा -

दिलासादायक! घरोघरी लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार

माहुलमध्ये उभारण्यात येणार ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा