धारावी, वरळी, अंधेरी, दादर, माहीम, आणि कुर्लामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तर फोर्ट, कुलाबा, सॅन्डहर्स्ट रोड या भागात मृत्यू दर कमी आहे.
वरळी, धारावी, दादर, माहीम हे कोरोनाचे हॉटस्पॉट होते. या भागात आतापर्यंत कोरोनामुळे ३७९ बळी गेले आहेत. तर अंधेरी पूर्वमध्ये ३५१ आणि कुर्लामध्ये ३४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कमी मृत्यू फोर्ट, कुलाबामध्ये झाले आहेत. फोर्ट, कुलाबा या ए विभागात ४८, सॅन्डहर्स्ट रोड येथील बी विभागात ६०, मरिन लाईन्स येथील सी विभागात ६१, आर नॉर्थ विभागत ६४ मृत्यूंची नोंद झाली आहे.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मृत्यूंची संख्या कमी ठेवण्यात पालिकेला यश आलं होतं. मात्र मुंबईतील मृत्यू दर ३.३ वरून ५.८३ टक्क्यांवर गेला आहे. देशाचा मृत्यूदर ३ टक्के आणि राज्याचा मृत्यूदर ४.५ आहे. त्यामुळे मुंबईचा मृत्युदर कमी करण्याचं मोठं आव्हान पालिका आरोग्य विभागासमोर आहे.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब आदी दीर्घ आजार असल्यास त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तसेच ६० वर्षांवरील रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने अशा व्यक्तींचे मृत्यू होत आहेत. रात्री १ ते पहाटे ५ या वेळेत रुग्ण ऑक्सिजन काढून बाथरूमला जात असल्याने कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. असे मृत्यू टाळता यावेत म्हणून रुग्णांना बेडजवळ पॉट देण्यास सांगण्यात आलं आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यास व्हिडीओ ऑडिट करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सर्व पालिका रुग्णालयांना दिले आहेत.
हेही वाचा -
Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित
डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय