अवयवदान करणं ही काळाची गरज बनली असली तरी त्याबाबत फारशी जनजागृती झालेली पहायला मिळत नाही. अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी सर जे. जे. रुग्णालयात महाअवयवदान मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचा एक भाग म्हणून जे. जे. रुग्णालयाच्या आवारात महाअवयवदान रॅलीही काढण्यात आली.
अवयवदान हा शब्द अनेकांना संजीवनी देणारा ठरतो. विशेषतः महत्त्वाच्या मुख्य अवयवांचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी अवयवदानाला अतीव महत्त्व येतं. अनेक गैरसमजांमुळे पूर्वीच्या काळी अवयवदान केलं जात नसे. परंतु अलीकडच्या काळात अवयवदानाच्या बाबतीत कमालीची जागृती झाली असून अवयवदानच नव्हे तर देहदान करणाऱ्यांच्या संख्येतही सातत्यानं मोठी वाढ होत आहे. परंतु अनेकदा त्याबाबत अंधश्रद्धाही निर्माण झालेल्या आपल्याला पहायला मिळतात. या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जे. जे. रूग्णालयानं महाअवयवदान रॅलीचं आयोजन केलं होतं.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे, डॉ. व्यंकट गीते, डॉ. रागिणी पारेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते. या महारॅलीमध्ये डॉक्टर, इंटर्न डॉक्टर, नर्स यांसह जवळपास ५०० पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग दर्शविला होता. १७ सप्टेंबरपासून या महाअवयवदानाच्या मोहिमेला सुरूवात झाली असून पोस्टर मेकिंग, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अवयवदानाचा संदेश देण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या पुढाकारानं राज्यात अवयवदानाची जनजागृती मोहिम सर्व राज्यात सुरू करण्यात आली आहे. महाअवयवदानाच्या निमित्तानं राज्यातील १७ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही रॅली काढण्यात आली आहे. १७ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रमांद्वारं अवयवदानाचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. अवयवदानाबाबत लोकांच्या अंधश्रद्धा दूर करून यामागचा वैज्ञानिक दृष्टीकोन लोकांना समजावून देण्याचं काम जे. जे. रूग्णालयातर्फे करण्यात येणार आहे.
- डॉ. मुकुंद तायडे, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय
हेही वाचा -
न धुतलेल्या कपड्यांमुळे सायन रुग्णालयातील ४० शस्त्रक्रिया रद्द
'नॅनोकणां'द्वारे सापाच्या विषाच्या तीव्रतेवर अंकुश