अवयवदान हेच श्रेष्ठदान आहे. याचा प्रत्ययही नुकताच अाला. मृत्यूनंतरही ४५ वर्षीय महिलेनं अवयवदान करून दोघांचे प्राण वाचवले अाहेत. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील कांता मगरे या महिलेचा अपघाता मृत्यू झाला. त्यानंतर तिचे हृदय सुरत येथील ५९ वर्षीय व्यक्तीला तर यकृत ५६ वर्षीय श्रीनगर येथील व्यक्तीला दान करण्याचा निर्णय घेतला.
कांता अशोक मगरे या औरंगाबाद हून ठाण्याला काही समान घेऊन छोटा हत्ती या वाहनाने त्यांच्या घरी येत होत्या. यावेळी भिवंडी येथील पडघा येथे त्यांच्या टेम्पोला मोठ्या टेम्पोने धडक दिली. यामध्ये कांता रस्त्यावर पडल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कांता यांना जवळच्या इंदिरा गांधी या रुग्णालयात दाखल केलं. इंदिरा गांधी रुग्णालयात नीट उपचार न होत असल्या कारणाने त्यांना एस. एस.रुग्णालयात नेले. मात्र, तेथे सिटी स्कॅनची सुविधा नसल्याने त्यांना नौपाडा येथील ज्यूपिटर स्कॅनिंग सेंटरमध्ये ब्रेन स्कॅनिंगसाठी हलवण्यात आले.
ब्रेन स्कॅनिंग करून कांता याना ठाणे येथील वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. ४ दिवसांच्या उपचारानंतर कांता यांचे ब्रेन डेड झालं असल्याचं घोषित करण्यात आलं. कांता यांच्या मृत्यूचे दुःख न मानता त्यांच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. ज्युपिटर रुग्णालयातील अवयवदान समन्वयक अनिरुद्ध कुळजारणी यांनी मगरे कुटुंबियांना अवयवदानाची माहिती दिली आणि मगरे कुटुंबीयांनी कांता यांचं हृदय आणि यकृत दान केलं.
ठाण्यात राहणाऱ्या कांता मगरे यांना २ मुली व १ मुलगा असून त्यांचे पती अशोक मगरे हे ठाण्यात रिक्षा चालवतात. कांता आमच्यात नाही याचं आम्हाला दुःख आहे. पण त्यासोबतच त्यांचे अवयव दान करून आम्ही २ जणांना जीवनदान दिलं याचा आनंददेखील आहे, असं कांता यांचे भाऊ नितीन पोटफोडे यांनी म्हटलं.
हेही वाचा -
मुलगा गेल्याचं दुःख न करता केलं नेत्रदान