Advertisement

राज्य सरकार घेणार क्षयरुग्ण, कुष्ठरुग्णांचा शोध

कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा राज्य सरकारकडून शोध घेण्यात येणार आहे.

राज्य सरकार घेणार क्षयरुग्ण, कुष्ठरुग्णांचा शोध
SHARES

कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा राज्य सरकारकडून शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा व महापालिका क्षेत्रात ‘संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध व कुष्ठरुग्ण शोध अभियानाला’ १ डिसेंबरपासून सुरूवात करण्यात आली असून हे अभियान ३१ डिसेंबर २०२० पर्यंत राबवण्यात येईल. या अभियानांतर्गत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे.  

तपासणी मोहिमेत राज्यातील सुमारे ८ कोटी ६६ लाख २५ हजार २३० लोकसंख्येचं सर्वेक्षण करण्यात येईल. त्यात ग्रामीण भागातील संख्या ६ कोटी ८२ लाख २३ हजार ३९८ एवढी असून जोखीमग्रस्त शहरी लोकसंख्या १ कोटी ८४ लाख एवढी आहे. पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच यांनी आपल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करावी, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या जात आहेत. रोग शास्त्रीय अभ्यासानुसार या दोन्ही आजाराचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णाला या रोगांपासून निर्माण होणाऱ्या गुंतागुतीचा सामना तर करावा लागतोच त्याचप्रमाणे त्यांच्या सहवासातील इतर निरोगी लोकांना संसर्गाचा धोका वाढून त्याची साखळी अखंड राहते. त्यामुळे अशा रुग्णांचा शोध, निदान आणि उपचार करण्याकरीता घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे.

हेही वाचा- मुंबईतील २४ शिक्षक, १० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतला. या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी आणि महापालिकाक्षेत्रात  महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती तर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती नेमण्यात आली आहे. पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचं डॉ. व्यास यांनी सांगितलं.

सर्वेक्षण पथकात दोन सदस्य असतील. त्यात आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांचा समावेश असणार आहे. ग्रामीण भागातील सर्व घरांचे तर शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. रोगनिदान झाल्यास आरोग्यसंस्थेकडून संपूर्ण मोफत औषधोपचार करण्यात येणार असल्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितलं.

घरी येणाऱ्या पथकास तपासणीसाठी सहकार्य करून नागरीकांनी मोहीम यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी केलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा