Advertisement

रॅपिड टेस्ट करण्यास केंद्र सरकारची परवानगी

राज्यात ७५ हजार चाचण्या केल्या जातील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

रॅपिड टेस्ट करण्यास केंद्र सरकारची परवानगी
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहेत. केंद्र सरकारनं काही निकष लावून राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात ७५ हजार चाचण्या केल्या जातील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राज्याच्या कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह आणि झूम अॅपच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती त्यांनी दिली.

ऑक्सीजन स्टेशन उभारणार

कोरोना उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक खाटेजवळ ऑक्सिजन मास्क आणि त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यकता वाटल्यास त्याचा वापर केला जाईल. मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ नये म्हणून त्याच्या उत्पादकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

म्हणून रुग्णांची संख्या वाढतेय

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कारण राज्यात सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत. त्यासाठी आयसीएमआरच्या सूचना कटाक्षानं पाळल्या जात आहे. त्याचबरोबर घरोघर जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण देखील केलं जात आहे. त्यासाठी ६ हजार ३५९ पथके कार्यरत आहेत. कुठलीही तडजोड न करता सर्वेक्षण केलं जात आहे. राज्याचा कोरोना रुग्ण दुप्पटीचा वेग हा मंदावत असून सुरूवातीला दोन दिवसांवर असणारा हा दर आता सुमारे ७ दिवसांवर गेला आहे. हा दर २० ते २५ दिवसांवर यावा तेव्हाच काहीशी समाधानाची बाब मानता येईल.

हायड्रोक्लोरोक्विनचे वाटप

हायड्रोक्लोरोक्विनमुळे प्रतिबंधात्मक शक्ती वाढते म्हणून मुंबईत काही भागात या गोळ्या वाटपासाठी मान्यता देण्यात आली आहे. मात्र ज्यांना हृदयविकार आहे किंवा ६० वर्षांवरील आणि १५ वर्षाखालील व्यक्तींना त्या दिल्या जाणार नाहीत.


विशेष रुग्णालयं उभारणार

दरम्यान कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी २५ विशेष रुग्णालयांची भर पडली आहे. यामुळे कोरोना विशेष रुग्णालयांची संख्या वाढून ५५ वर गेली आहे. राज्यात यामुळे ६६६० खाटा उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने नव्याने ८ रुग्णालये तर वैद्यकीय शिक्षण विभागाने १७ रुग्णालये अधिसूचित केली आहेत. त्यामुळे अतिरिक्त ४३५५ खाटांची उपलब्धता झाली आहे. पूर्वी घोषित केलेल्या ३० रुग्णालयातील २३०५ खाटा आणि आताच्या ४३५५ खाटा अशा राज्यात एकूण ६६६० खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली.



हेही वाचा

जसलोक हॉस्पीटलच्या स्टाफमध्ये आढळले ३० नवे कोरोना रुग्ण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा