पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच पदवी प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असा खुलासा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला. (no covid stamp on degree certificate says maharashtra higher education minister uday samant)
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची परीक्षेसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी, प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक सूचनांचं पालन करून विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी केली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. त्यानंतर परीक्षांचा जो निकाल लागेल, त्यानुसार विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर कोविड–१९ च्या संदर्भाने कुठलाही उल्लेख नसेल. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, त्यामध्ये काहीही बदल असणार नाही, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
हेही वाचा - विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ चा शिक्का कसा? आशिष शेलारांचा सरकारला सवाल
पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार. त्यावर कोविड-१९ चा उल्लेख राहणार नसून याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री @samant_uday यांचे स्पष्टीकरण pic.twitter.com/4FDoYBvsr4
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 17, 2020
अमरावतीतील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ असा शेरा आढळून आल्याचा गंभीर प्रकार दोन महिन्यांपूर्वी समोर आला होता. विरोधकांकडून जोरदार टीका झाल्यानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना व सर्व कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी पत्र पाठवत चौकशीचे आदेश दिले होते. कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ चा उल्लेख शासन आदेश नसतानाही करण्यात आला आहे. असा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात यावा, असं त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
राज्य सरकारने यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेऊन आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लावण्याचं निश्चित केलं आहे. बहुतेक विद्यापीठांच्या परीक्षा आॅनलाईन घेण्यावर भर आहे.