मुंबईवरील ओखी वादळचा धोका टळला असला, तरी पाऊस आणि बदललेल्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि संसर्गाचा धोका मात्र वाढला आहे.
केरळ आणि तामिळनाडूला झोडपून काढल्यानंतर कोकण किनारपट्टीकडे सरकलेल्या ओखी वादळामुळे मुंबईत सोमवारी संध्याकाळी आणि मंगळवारी दिवसभर पावसाने दमदार बॅटिंग केली. आता वादळाचे सावट दूर झाले असून पावसानेही विश्रांती घेतली आहे. पण मागील दोन दिवस पडलेल्या पावसामुळे तापमानात कमालीची घट झाल्याने साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
विशेष म्हणजे मुंबईत पावसामुळे निर्माण झालेल्या वातावरणात विषाणू अधिक काळ तग धरून ठेवतात. त्यामुळे सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढण्याची अधिक शक्यता असते. मागील काही महिन्यांपासून मुंबईत डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच डिसेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे आजार बळावण्याची भीती वाढली आहे.