मुख आरोग्याशी संबंधित आजारांचा गांभीर्यानं विचार करत सार्वजनिक आरोग्य विभाग १ ते ३१ डिसेंबरपर्यंत मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबवणार आहे. ‘मौखिक कर्करोग मुक्त राज्य’ करण्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा प्रयत्न असून यासाठी राज्यस्तरीय मुख आरोग्य तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने या मुख आरोग्य तपासणीचं आयोजन केलं आहे. या मोहिमेचं उद्घाटन शुक्रवारी मालाडच्या एका सामान्य रुग्णालयात आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. शुक्रवारी दिवसभर मालाडच्या सामान्य रुग्णालयात १२५ रुग्णांची मोफत मुख आरोग्य तपासणी करण्यात आली.
मुख आरोग्य तपासणी ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी मोहीम आहे. तपासणी महिनाभर होणार असली तरी ही तीन टप्प्यात चालणारी प्रक्रिया आहे. तपासणीनंतर निदान आणि उपचार असा हा कार्यक्रम असणार आहे.
- डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री
या कार्यक्रमात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. सतीश पवार, अतिरिक्त संचालक डॉ. साधना तायडे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. पंकज चतुर्वेदी, इंडियन डेंटल असोसिएशनचे सचिव अशोक ठोबळे, स्थानिक नगरसेवक आदी उपस्थित होते.
या आरोग्य तपासणीत राज्यातील ३० वर्षांवरील स्त्री-पुरुषांची तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी सर्व शासकीय, महापालिका, नगरपालिका दवाखाने याठिकाणी मोफत उपलब्ध केली जाणार आहे. गाव पातळीवर ही तपासणी एएनएम आणि एमपीडब्ल्यू यांच्यामार्फत करत गरजूंना पुढील उपचारांसाठी नजीकच्या दवाखान्यात पाठवण्यात येईल.
देशात प्रामुख्याने स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा आणि तोंडाच्या कॅन्सरचा समावेश होतो. यामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर जास्त प्रमाणात आढळतो. या कॅन्सरचं निदान वेळेत झालं आणि योग्य ते उपचार मिळाले तर रुग्ण बरा होण्याचं प्रमाण ७० ते ७५ टक्के असतं. तोंडाच्या कॅन्सरचं निदान लवकरात लवकर करणं गरजेचं आहे.
तोंडात चट्टा किंवा व्रण या रुपात दिसतात जे उपचाराद्वारे पूर्ण बरं होऊ शकतात.