अवयव प्रत्यार्पणाच्यादृष्टीने मुंबई सेंट्रल येथील जगजीवन राम रुग्णालयानं एक नवीन पाऊल टाकलं आहे. याआधीसुद्धा मुंबई सेंट्रलच्या जगजीवन राम रुग्णालयामध्ये अनेक जटील शस्त्रक्रिया करण्यात आल्या अाहेत. यामध्ये डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या टीमने केलेल्या समर्पित प्रयत्नांमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. तर आता अवयव प्रत्यार्पणासारखी कठीण समजली जाणारी शस्त्रक्रिया करुन या क्षेत्रात मोठी आघाडी घेतली आहे. रुग्णालयाच्या या कामगिरीमुळं आपले अवयव गमावलेल्या अनेकांच्या जीवणात आशेचा नवा किरण उमलला आहे.
पश्चिम रेल्वेच्या एका माजी कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ९ जुलै २०१८ रोजी मुंबई सेंट्रल रुग्णालयात भरती करण्यात आले. पश्चिम रेल्वेच्या अधिक्षक पदावरुन ते निवृत्त झाले होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या दोन्ही धमन्यांमधील रक्त गोठले असल्याचं लक्षात आलं. त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र ४८ तासानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि त्यांना मेंदुतील रक्तस्त्राव सुरु झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार क्षेत्रीय प्रत्यारोपन समन्वय केंद्राला सुचीत करण्यात आले.
पुढील १२ तासात सर्व औपचारिकता पुर्ण करुन १६ जुलै रोजी केईएम रुग्णालयातील डॉक्टरांची एक चमु अवयव प्राप्त करण्यासाठी जगजीवन राम रुग्णालयात दाखल झाली. त्यांनी दोन्ही मुत्रपिंड (किडनी) आणि कार्निया हे अवयव एका विशेष ग्रीन कॉरीडॉरच्या माध्यमातून अपोलो आणि केईएम रुगणालयात पाठवले. त्या रुग्णालयात अवयव मिळवण्यासाठी नोंदणी केलेल्या रुग्णांच्या शरीरात यशस्वीरित्या त्या अवयवांचं रोपण करण्यात आलं. मुंबई सेंट्रलस्थित जगजीवन राम रुग्णालयात पहिल्यांदाच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली असून यापुढेही अवयव दानाच्या माध्यामातून अनेकांच्या जीवनात आनंद फुलवण्याचं कार्य सुरु राहणार असल्याचं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितलं.
हेही वाचा -
मुंबईत गॅस्ट्रोचे सर्वाधिक रुग्ण!
किडनी निकामी झालेल्या रुग्णांसाठी विशेष डायलिसिस विभाग सुरू