देशातील अनेक राज्यांमध्ये एकीकडे कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असतानाच एक धक्कादायक माहिती माहिती अधिकार कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या अर्जामुळे समोर आली आहे. ११ एप्रिलपर्यंत देशात कोरोना लसींचे तब्बल ४५ लाख डोस वाया गेल्याचा खुलासा माहिती अधिकार कायद्याअंतर्गत करण्यात आला आहे.
पाच राज्य लस वाया घालवणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये आघाडीवर असल्याचं सांगण्यात आलं आहे. माहिती अधिकाराअंतर्गत देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार योग्यपद्धतीनं १० कोटी ३४ लाख लसींचा वापर करण्यात आला आहे. तर ४४ लाख ७८ हजार लसी न वापरताच फेकून द्याव्या लागल्या आहेत. एकूण २३ टक्के लसींचे डोस वाया गेल्याची माहिती या आकडेवारीतून समोर आली आहे.
अनेक राज्यांमध्ये लसींचा योग्य पद्धतीनं वापर न होता, त्या वाया जात आहेत. ११ एप्रिलपर्यंत ४४ लाख ७८ हजार लसी नुकत्याच समोर आलेल्या आरटीआय अर्जानुसार वाया गेल्या आहेत.
तामिळनाडूमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या लसींपैकी तब्बल १२.१० टक्के लसींचे डोस वाया गेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हरयाणा, तिसऱ्या क्रमांकावर पंजाब, चौथ्या क्रमांकावर मणिपूर तर पाचव्या क्रमांकावर तेलंगण राज्याचा सामावेश आहे.
हरयाणामध्ये ९.७४ टक्के, पंजाबमध्ये ८.१२ टक्के तर मणिपुरमध्ये ७.८० टक्के लसी वाया गेल्या आहेत. तेलंगणला पाठवण्यात आलेल्या लसींपैकी ७.५५ टक्के लसी न वापरताच फेकून द्याव्या लागल्या आहेत.
देशातील काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असेही आहेत ज्यांनी कोरोनाच्या लसींचा अगदी योग्य पद्धतीनं वापर करत कमीत कमी लसी वाया जातील याची खबरदारी घेतली आहे.
माहिती अधिकारांतर्गत समोर आलेल्या आकडेवारीनुसार केरळ, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मिझोरम, गोवा, दमण आणि दीव, अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीपसारख्या ठिकाणी लसींचा अधिक योग्य पद्धतीनं वापर करण्यात आली आहे.
कोणत्या राज्याने किती लसींचे डोस वाया घालवले ?
राजस्थान – ६ लाख १० हजार ५५१
तामिळनाडू – ५ लाख ४ हजार ७२४
उत्तर प्रदेश – ४ लाख ९९ हजार ११५
बिहार – ३ लाख ३७ हजार ७६९
गुजरात – ३ लाख ५६ हजार
महाराष्ट्र – ३ लाख ५६ हजार ७२५
कर्नाटक – २ लाख १४ हजार ८४२
तेलंगणा – १ लाख ६८ हजार ३०२
पंजाब – १ लाख ५६ हजार ४२३
हरयाणा – २ लाख ४६ हजार ४६२
हेही वाचा