Advertisement

World heart Day: बायपास सर्जरीनंतरही २५ ते ३० वर्षे जगणं शक्य


World heart Day: बायपास सर्जरीनंतरही २५ ते ३० वर्षे  जगणं शक्य
SHARES

हृदयाची बायपास शस्त्रक्रिया एखाद्याचा हृदयविकाराचा धोका कमी करू शकतो, कोरोनरी आर्टरी सारख्या रोगाची लक्षणे तसेच हृदयविकाराच्या इतर समस्यांवर उपचाराकरिता देखील फायदेशीर ठरते. चूकीच्या माहितीमुळे लोकांमध्ये बायपास शस्त्रक्रियेबद्दल गैरसमज पसरल्याचे दिसून येते. त्याऐवजी एंजियोप्लास्टी किंवा कमीतकमी हल्ल्याच्या हृदय शस्त्रक्रियेसारखे इतर पर्याय शोधले जातात. मात्र हृदयाची बायपास शस्त्रक्रिया ही प्रभावशाली असून या पद्धतींविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे. या उपचार पध्दतीनंतर  छातीत दुखणे, श्वासोच्छवासाच्या अडचणी, छातीत घट्टपणा आणि थकवा यासारख्या लक्षणांमध्ये सुधारणा होणार आहे.

हल्ली बदलती जीवनशैली आणि कौटुंबिक इतिहास किंवा लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब यासारख्या आरोग्य विषयक समस्यांमुळे बरेच लोक हृदयविकाराच्या समस्येने ग्रस्त असल्याचे दिसून येते. हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि इतर समस्या बर्‍याच रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आपल्या हृदयाच्या स्थितीनुसार आपले हृदयरोग शल्यविशारद आपल्याला अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. काही रुग्णांमध्ये निरोगी जीवनशैली तसेच औषधोपचारांनी आजारावर मात करता येते तर काहींना हार्ट बायपास शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.

बायपास शस्त्रक्रिया म्हणजे?

हृदयाच्या रक्तवाहिन्यांना अडथळ्याच्या पुढे पर्यायी रक्तवाहिन्या जोडून पुरेसे रक्त पुढील भागाला पुरवण्याची व्यवस्था करणे यालाच बायपास सर्जरी असे म्हणतात. बायपास सर्जरीमध्ये अडथळ्यांना बायपास करण्यासाठी ज्या रक्तवाहिन्यांचा वापर केला जातो त्यांना ‘ग्राफ्ट’ असे म्हणतात. पायाच्या अशुद्ध रक्त वाहणाऱ्या रक्तवाहिन्या , हाताची शुद्ध रक्त वाहणारी रक्तवाहिनी आणि छातीच्या पिंजऱ्यामधील रक्तवाहिन्या या ग्राफ्ट म्हणून वापरल्या जातात.

'भारतीय रूग्णांमध्ये कोरोनरी आर्टरीचा आकार हा पाश्चिमात्य नागरिकांच्या तुलनेने लहान असतो. आमच्या रूग्णांना बर्‍याचदा मधुमेह असतो त्यामुळे बायपास हा अनेक महत्त्वपूर्ण कोरोनरी आर्टरी ब्लॉक्सवर उपचार करण्याचा उत्तम मार्ग ठरतो.  बायपास सर्जरी म्हणजे हा अगदी शेवटचा पर्याय नसून पुढील २० ते २५ वर्षे रुग्ण उत्तम जीवन जगू शकतो. शस्त्रक्रियेनंतर आपण चांगले आयुष्य जगण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल करून निरोगी आयुष्याच्या दृष्टी चांगल्या शारीरीक सवयींचे पालन करणे गरजेचे आहे. सुरुवातीचे ४ ते ६ आठवडे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे', सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल एण्ड रिसर्च सेंटर, मुंबई येथील कार्डियो-थोरॅसिक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा