मुंबई - जेवणाची रुची वाढवण्यासाठी आणि शरीराला जीवनसत्वं मिळण्यासाठी भाज्या अावश्यक असतात. मात्र या भाजीपाल्यामधून मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे. दहिसर रेल्वेस्टेशननजीकच्या आवारात सांडपाण्यावर भाजीपाला पिकवला जात आहे. तितक्याच बेफिकिरीने तो घाण पाण्यात धुतला जात आहे. दादरसारख्या गजबजलेल्या परिसरातही भाजीविक्रेते ग्राहकांसमोरच घाण पाण्यात भाजीपाला स्वच्छ करतात. सध्या आजारांची साथ सुरू आहे. त्यामुळे दूषित पाण्याच्या भाज्या खाणे टाळायला हवे, असा सल्ला डॉक्टर देताहेत. तर पालिकेने या गोष्टीला आळा घातला पाहिजे, हे थांबवले पहिजे, तरच मुंबईकर आजारापासून मुक्त होतील, अशी मागणी मुंबईकर करताहेत.