शाळेत वही अाणायला विसरल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका शिक्षिकेने विजया निवृत्ती चौगुले या अाठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. ३०० उठाबशा काढल्यानंतर विजया जागेवरच कोसळली. कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर तिला अाता केईएम रुग्णालयात हलवण्यात अालं असून तिच्यावर शुक्रवारी रात्रीपासून उपचार सुरू झाले अाहेत. शनिवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केईएम रुग्णालयात जाऊन विजयाची भेट घेतली. तिच्या प्रकृतीची चौकशी करून तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर उपचार करणारे न्यूरॉलॉजिस्ट डॉ. रावत आणि डॉ. प्रवीण बांगर यांच्याकडून तिच्या उपचाराची माहिती घेतली.
विजयाला मिळणाऱ्या उपचाराबाबत तिचं कुटुंबीय समाधानी अाहे. ती लवकरच पूर्णपणे बरी होऊन पुन्हा कोल्हापूरच्या शाळेत जाऊ शकेल. पुन्हा त्याच शाळेत जाण्याची तिची मानसिकता नसेल तर विजयाला जवळच्या दुसऱ्या शाळेत प्रवेश दिला जाईल. विजयाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे अाहे. तिच्यावर मोफत उपचार करण्यात येतील. विजयाचे वडीलही त्याच शाळेत शिपाई म्हणून नोकरीला असून त्या शाळेत नोकरी करायची नसल्यास, त्यांनाही दुसऱ्या शाळेत समायोजित केलं जाईल.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री
कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रूक या भावेश्वरी संदेश विद्यालयात अाठवीत शिकणाऱ्या विजया चौगुले हिला ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्यानंतर तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल तिला कोल्हापूरहून मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विजयाचे पाय अजूनही थरथर कापयाहेत. उठाबशा काढण्याची शिक्षा देणारी शाळेची मुख्याध्यापिका अश्विनी देवण हिला पोलिसांनी अटक केली आहे.