पावसाळ्यात डासांची पैदास वेगाने होत असल्याने डेंग्यू, मलेरियासारख्या घातक आजारांनी मुंबईकरांना हैराण केलं आहे. गेल्या 7 महिन्यांत राज्यभरात जवळपास 7, 604 नागरिकांना मलेरियाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. तसंच, मलेरियाची लागण होऊन मुंबईत दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेकडून करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 2017 या वर्षात आतापर्यंत 687 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. मुंबईवर विविध रोगांचे सावट पसरले असून मलेरियाने ग्रासलेले अनेक रुग्ण महापालिका रुग्णालयांसह विविध खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
राज्यभरात मलेरियाने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या ही 7604 इतकी असली तरी एकट्या मुंबईत गेल्या जुलै महिन्यात 752 जणांना हा आजार झाल्याची नोंद मुंबई महानगरपालिकेकडे आहे. यापैकीच दोन जण दगावल्याची नोंद आहे. दरम्यान, राज्यभरात दर महिन्याला जवळपास 1 हजार जणांना मलेरियाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे.
गेल्या वर्षी जुलै 2016 मध्ये 583 मलेरियाचे रुग्ण होते. तर, एकाचा बळी गेला होता. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईत पसरलेल्या आजारांची आकडेवारी बरीच वाढली असल्याचं दिसून येत आहे.
मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांपासून आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या घराजवळील परिसरात कुठेही पाणी साचू देऊ नये आणि स्वच्छता राखावी, असं आवाहन राज्य आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, राज्यभरात डासांनी चावल्याने भयंकर आजार बळावल्याचे 7 हजारांहून अधिक प्रकरणं समोर आली आहेत.