'कॅन्सर' हा शब्द जरी ऐकला तरी अनेकदा काळजाचा ठोका चुकतो. कॅन्सरवर जरी उपचार असले तरी ते कायमस्वरुपी कॅन्सरवर मात करु शकतील का? या प्रश्नाचं मात्र अजूनही उत्तर डॉक्टरांना सापडलेलं नाही. त्यामुळेच मुंबईसोबतच देशभरात दिवसेंदिवस कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
कॅन्सरचे भारतात २०० पेक्षा जास्त प्रकार आहेत. पण, त्यातील महत्त्वाचे ४ प्रकार आहेत. कार्सिनोमा, सोरकोमा, लिम्फोमा आणि ल्यूकेमिया. कार्सिनोमा हा प्रकार सामान्यपणे जास्त आढळतो. सध्याच्या घडीला भारतात जवळपास १.२ दशलक्ष म्हणजेच १२ लाख नव्याने आढळलेले कॅन्सर रुग्ण असल्याची माहिती टाटा रूग्णालयातून मिळते. ज्यात सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णांचा समावेश आहे.
परळच्या टाटा मेमोरिअल ट्रस्ट या कॅन्सरसाठी प्रसिद्ध असलेल्या रुग्णालयात २൦१७ या वर्षी ७൦ हजारांहून अधिक नवे रुग्ण कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी, त्याचं निदान करण्यासाठी दाखल झाले होते. ७൦ हजारांपैकी जवळपास ४२ हजार रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर असल्याचं अचूक निदान झालं. तर, २४ हजार लोकांनी टाटा रुग्णालयातून सेकंड ओपिनियन, इन्व्हेस्टिगेशन करुन घेतले. ६ हजार लोकांनी कॅन्सर होईल का? किंवा झाला आहे का? याचं निदान करुन घेतलं.
कार्सिनोमा हा प्रकार सर्वात जास्त महिलांमध्ये आढळतो. ज्यात ब्रेस्ट कॅन्सर, गर्भपिशवी आणि योनीला जोडणाऱ्या अवयवाच्या उतींमध्ये तयार होणाऱ्या कर्करोगाचा समावेश आहे. तर, पुरुषांमध्ये डोके, मान, फुप्फुस आणि अन्ननलिकेचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात आढळतो.
एका वर्षापासून ते ६൦ व्या वर्षापर्यंतच्या व्यक्तींना कॅन्सर होऊ शकतो. लहान मुलांमध्ये रेटिनोब्लोस्टोमा, विल्म्स ट्यूमर आणि रक्ताचा कर्करोग हे सामान्य कर्करोगाचे प्रकार आढळतात.
अनेकदा आपल्याला कॅन्सर झाला आहे हे माहीत असूनही रुग्ण उपचार घेण्यासाठी धजावत नाहीत. भिती आणि लाजेपोटी अनेकदा जीव गमवावा लागतो. मग, रुग्ण कॅन्सरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये रुग्णालयात दाखल होतात. पण, तोपर्यंत रुग्णावर उपचार करणं डॉक्टरांना कठीण होऊन जातं. स्त्रियांमध्ये ब्रेस्ट आणि गर्भाशयाचा कॅन्सर तर, पुरुषांमध्ये डोके आणि मानेचा कॅन्सर अशा कॅन्सरची लक्षणं लवकर दिसतात. त्यामुळे वेळीच उपचारही घेता येऊ शकतात.
स्त्रियांना होणाऱ्या कॅन्सरपैकी सर्वात गंभीर कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. दर वर्षी एकदा तरी स्क्रिनिंग करुन घेतलं पाहिजे. शिवाय, स्वपरिक्षण हेही महत्त्वाचं आहे. याशिवाय गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये कॉल्पोस्कोपी आणि नंतर बायोप्सी करतो. पण, स्टेज ३ किंवा ४ चे रुग्ण आल्यानंतर अशा त्यांना वाचवणं कठीण होऊन जातं.
राजश्री कटके, वैद्यकीय अधीक्षक, कामा हॉस्पिटल
एचपीव्ही म्हणजेच पॅपिल्लोमा व्हायरसचा प्रादुर्भाव, जास्त लठ्ठपणा, ओटीपोटात लठ्ठपणा असेही अनेक प्रकार कॅन्सरमध्ये आहेत. पण, कोणत्याही स्वरूपात तंबाखूचा वापर हे कर्करोगाचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. ३൦ टक्के कॅन्सरचं प्रमाण हे तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन टाळल्यामुळे रोखता येऊ शकतं.
भारतात जर कर्करोगाविरुद्ध लढाई द्यायची असेल तर तंबाखू, अल्कोहोल आणि लठ्ठपणा यावर मर्यादा आणणं महत्त्वाचं आहे. मात्र दुसरीकडे टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रूग्णांची वाढती संख्या ही कॅन्सरप्रती जनजागृतीही वाढल्याचंही दर्शवते.
डॉ. राजेंद्र बडवे, प्रमुख, टाटा रुग्णालय
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या अंदाजानुसार, 2020 पर्यंत भारतामध्ये १७.३ लाख नवीन कॅन्सरचे रुग्ण असतील आणि सरासरी ८.८ लाख मृत्यू कर्करोगामुळे होऊ शकतात. जगभरात एड्स, मलेरिया आणि क्षयरोगाने होणाऱ्या मृत्यूंपेक्षा कर्करोगाने मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) च्या अहवालानुसार, कॅन्सर जागतिक अर्थव्यवस्थेतील तीन सर्वात मोठ्या धोक्यांपैकी एक आहे. आणि या सर्वांच्या मुळाशी आहे तंबाखू हे सर्वात महत्त्वाचं कारण. त्यामुळे जर कॅन्सरशी लढा द्यायचा असेल, तर आधी तंबाखूशी लढा देणं गरजेचं आहे!
हेही वाचा
'फ्री फ्लॅप प्लास्टिक सर्जरी'ने दिलं जगण्याचं बळ