मुंबईकरांसाठी एक खुषखबर आहे. लवकरच मुंबईकरांना स्वस्त घर घेता येणार आहे. कारण येत्या 5 वर्षात मुंबईकरांसाठी तब्बल 10 लाख घरे बांधण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे. घरं बांधण्यायासाठी मुंबईसह उपमहानगरातील मिठागरच्या आणि ना विकास क्षेत्रातील जमिनींचा वापर करण्यात येणार आहे. मुंबईत घरांसाठी मोकळी जागाच नसल्यानं मिठागरे आणि ना विकास क्षेत्रातील जमिनींचाच पर्याय सध्या सरकारकडे आहे. तसंच नव्या गृहनिर्माण धोरणात मिठागरे आणि ना विकास क्षेत्राची जमीन गृहनिर्मितीसाठी मोकळी केली जाणार असल्याची माहिती म्हाडातील सुत्रांनी दिलीय. त्यामुळे येत्या काळात मिठागरे आणि ना विकास क्षेत्राच्या 5000 एकराहून अधिक जमिनीवर हजारो घरे बांधली जातील. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी आनंद गुप्ता यांनी ही माहिती दिलीय.
केंद्राच्या हिरव्या कंदिलाची गरज
राज्य सरकारनं या जमिनी खुल्या केल्या तरी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. कारण या जमिनींचा ताबा केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागणार. त्यानुसार या संबंधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून या प्रस्तावाला मंजुरी घ्यावी लागणार असून यासाठी बराच कालावधी लागणार आहे.