Advertisement

बीडीडीच्या जागांवर 60 ते 72 मजली टॉवर


बीडीडीच्या जागांवर 60 ते 72 मजली टॉवर
SHARES

मुंबईची ओळख असलेल्या नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळीतील बीडीडी चाळी आता इतिहासजमा होणार आहेत. या चाळींच्या जागेवर टोलजंग इमारती उभ्या रहाणार आहेत. अंदाजे 100 वर्षे जुन्या या इमारतींमध्ये हजारो कुटुंब 160 चौ. फुटाच्या घरात रहात आहेत. आता या कुटुंबाना थेट 500 चौ. फुटाचे 2 बीएचकेचे घर मिळणार आणि तेही टोलेजंग टॉवरमध्ये. पुढच्या सात वर्षात या तिन्ही ठिकाणच्या बीडीडी चाळींचा संपूर्ण चेहरामोहरा बदलणार असून याच बीडीडी चाळींच्या जागेवर यापुढे 20-30 नव्हे तर चक्क 60 ते 72 मजली टॉवर उभे रहाणार आहेत. 

पुनर्विकसित इमारती या 23 मजल्यांच्या असणार आहेत. तर विक्रीच्या इमारती या 60 ते 72 मजली असणार आहेत. तसेच 23 मजल्यांच्या कमर्शियल इमारतींचाही या प्रकल्पात समावेश असणार आहे. त्यामुळे नायगाव, ना. म. जोशी आणि वरळी परिसराचा ‘भाव’ आता चांगलाच वाढणार आहे. या प्रकल्पातून म्हाडाला मोठ्या संख्येने हाऊसिंग स्टॉक अर्थात अतिरिक्त घरे मिळणार असून या घरांची विक्री सोडतीद्वारे सर्वसामान्यांना केली जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात प्राइम एरियातील घरांचाही म्हाडाच्या सोडतीत समावेश असणार हे मात्र नक्की.

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अखेर म्हाडाने मार्गी लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी, 22 एप्रिलला जांबोरी मैदान येथे एका शानदार सोहळ्यात  पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर प्रकल्पाच्या कामाला सुरूवात करत सात वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचा म्हाडाचा मानस आहे. बीडीडीचा पुनर्विकास होणार, रहिवाशांना 500 चौ. फुटांची घरे मिळणार हे सर्वांच माहीत आहे. पण हा प्रकल्प नेमका कसा असणार आहे, त्यात कोणत्या सुविधा देण्यात येणार आहे, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास हा परिसर नेमका कसा दिसणार, असे एक ना अनेक प्रश्न बीडीडीतील रहिवाशांसह मुंबईकरांना पडले असतील.

या प्रकल्पाचा मुंबई लाइव्हने घेतलेला हा आढावा

  • शिवडी, वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग अशा चार ठिकाणी 92 एकरवर बीडीडी चाळी
  • वरळीत 121, शिवडीत 13, नायगावात 42 तर, ना. म. जोशी मार्ग येथे 32 अशा एकूण 207 चाळी
  • 123 मध्ये बीडीडीतील 160 चौ. फुटांची घरे भाड्याने कामगार, गिरणी कामगार यांना देण्यात आली
  • शिवडी वगळता वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील 195 चाळींचा होणार पुनर्विकास
  • सध्याच्या घडीला 195 चाळींमध्ये 16 हजार 203 कुटुंबांचे संसार
  • यात 2091 पोलिसांच्या कुटुंबांचाही सहभाग
  • 86.98 एकरवरील बीडीडी चाळींचा पुनर्विकास
  • पुनर्विकासाद्वारे रहिवाशांना 160 चौ. फुटांच्या मोबदल्यात थेट 500 चौ. फुटाचे 2 बीएचकेचा फ्लँट मिळणार
  • गार्डन, शाळा, समाज मंदिर, मोठे रस्ते. रुग्णालय, ओपन स्पेस, फायर स्टेशन अशा सुविधा मिळणार
  • नायगावच्या पुनर्विकासाचे कंत्राट एल अॅण्ड टीला
  • तर ना. म.जोशी चे कंत्राट शापुरजी-पालनजीला
  • वरळीच्या पुनर्विकासासाठी नुकत्याच निविदा मागवण्यात आल्या आहेत.
  • शिवडीची जागा केंद्राच्या ताब्यात असल्याने तुर्तास पुनर्विकासातून शिवडीला वगळण्यात आले आहे
  • 1 लाख रुपये काँपर्स फंड ,काँपर्स फंडमध्ये वाढ होण्याची शक्यता
  • 10 वर्षे मेटनेन्स नाही
  • काही ठिकाणी रहिवाशांसाठी (पुनर्वसन) 20 मजली तर काही ठिकाणी 23 मजली इमारती
  • सेल अर्थात विक्रीसाठीच्या इमारती 60 ते 72 मजली
  • नायगावमध्ये विक्रीसाठीची इमारत असणार 72 मजल्यांची
  • नायगावात 23 मजली कमर्शियल कॉम्प्लेक्सही
  • सात वर्षात प्रकल्प पूर्ण करणार
  • म्हाडाला मिळणार मोठा हाऊसिंग स्टॉक
  • हाऊसिंग स्टाँकमधील घरे सोडतीद्वारे सर्वसामान्यांना विकणार
  • त्यामुळे येत्या काळात दक्षिण मुंबईतील घरांचाही सोडतीत असणार समावेश
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा