मुंबईची ओळख असलेल्या नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळीतील बीडीडी चाळी आता इतिहासजमा होणार आहेत. या चाळींच्या जागेवर टोलजंग इमारती उभ्या रहाणार आहेत. अंदाजे 100 वर्षे जुन्या या इमारतींमध्ये हजारो कुटुंब 160 चौ. फुटाच्या घरात रहात आहेत. आता या कुटुंबाना थेट 500 चौ. फुटाचे 2 बीएचकेचे घर मिळणार आणि तेही टोलेजंग टॉवरमध्ये. पुढच्या सात वर्षात या तिन्ही ठिकाणच्या बीडीडी चाळींचा संपूर्ण चेहरामोहरा बदलणार असून याच बीडीडी चाळींच्या जागेवर यापुढे 20-30 नव्हे तर चक्क 60 ते 72 मजली टॉवर उभे रहाणार आहेत.
पुनर्विकसित इमारती या 23 मजल्यांच्या असणार आहेत. तर विक्रीच्या इमारती या 60 ते 72 मजली असणार आहेत. तसेच 23 मजल्यांच्या कमर्शियल इमारतींचाही या प्रकल्पात समावेश असणार आहे. त्यामुळे नायगाव, ना. म. जोशी आणि वरळी परिसराचा ‘भाव’ आता चांगलाच वाढणार आहे. या प्रकल्पातून म्हाडाला मोठ्या संख्येने हाऊसिंग स्टॉक अर्थात अतिरिक्त घरे मिळणार असून या घरांची विक्री सोडतीद्वारे सर्वसामान्यांना केली जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात प्राइम एरियातील घरांचाही म्हाडाच्या सोडतीत समावेश असणार हे मात्र नक्की.
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अखेर म्हाडाने मार्गी लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी, 22 एप्रिलला जांबोरी मैदान येथे एका शानदार सोहळ्यात पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर प्रकल्पाच्या कामाला सुरूवात करत सात वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचा म्हाडाचा मानस आहे. बीडीडीचा पुनर्विकास होणार, रहिवाशांना 500 चौ. फुटांची घरे मिळणार हे सर्वांच माहीत आहे. पण हा प्रकल्प नेमका कसा असणार आहे, त्यात कोणत्या सुविधा देण्यात येणार आहे, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास हा परिसर नेमका कसा दिसणार, असे एक ना अनेक प्रश्न बीडीडीतील रहिवाशांसह मुंबईकरांना पडले असतील.
या प्रकल्पाचा मुंबई लाइव्हने घेतलेला हा आढावा