
मुंबईतील उड्डाणपूल आणि महत्त्वाच्या रस्ते संरचनांच्या देखभालीसाठी आता एकाच यंत्रणेकडे जबाबदारी देण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) लवकरच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) 24 उड्डाणपूल आणि अनेक महत्त्वाच्या रस्ते संरचनांचा ताबा घेणार आहे.
या हस्तांतरणामध्ये मुंबईतील सुमारे 20.25 किमी लांबीचे 24 उड्डाणपूल, एक रोड ओव्हरब्रिज, चार पादचारी पूल, चार पादचारी भुयारी मार्ग, एक वाहन भुयारी मार्ग आणि चार प्रमुख जंक्शन्सचा समावेश आहे.
राज्य सरकारने नोव्हेंबरमध्ये या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर 23 एप्रिल रोजी उच्चस्तरीय बैठकीत हस्तांतरण प्रक्रिया आणि दुरुस्ती आराखड्यावर चर्चा करण्यात आली.
हस्तांतरण पूर्ण झाल्यानंतर या सर्व उड्डाणपूलांची देखभाल, डांबरीकरण, खड्डे भरणे आणि संरचनात्मक दुरुस्तीची जबाबदारी BMC कडे येणार आहे. सध्या मात्र महसूलाशी संबंधित अधिकार MSRDC कडेच राहतील.
MSRDC ने 2029 पर्यंत देखभालीसाठी कंत्राटदार नेमला असून तो सध्या रंगकाम, लेन मार्किंग आणि खड्डे दुरुस्तीचे काम पाहत आहे.
राज्य सरकारचा उद्देश मुंबईतील सर्व उड्डाणपूलांच्या देखभालीसाठी एकच यंत्रणा जबाबदार ठेवण्याचा आहे. यापूर्वी उड्डाणपूल MSRDC च्या अखत्यारीत असल्याने तक्रारी असूनही BMC ला थेट हस्तक्षेप करता येत नव्हता.
दरम्यान, डिझाईन ड्रॉइंग, करारपत्रे, बँक गॅरंटी आणि स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे अद्याप MSRDC कडून प्रलंबित आहेत. नुकतेच वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेकडून (VJTI) स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आल्याची माहिती MSRDC अधिकाऱ्यांनी दिली असून त्याचा अहवाल लवकरच सादर होणार आहे.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे Ashwini Bhide यांनी सांगितले की, सध्याचे जाहिरात करार संपल्यानंतर उड्डाणपूलांवरील जाहिरात हक्कही BMC कडे हस्तांतरित केले जातील. त्यामुळे विशेषतः पावसाळ्यात दुरुस्ती आणि देखभाल कामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
