मुंबई - रेल्वे, मुंबईची लाइफलाइन. पण हीच लाइफलाइन गेल्या काही वर्षात डेथलाइन बनली आहे. 2012 ते 2016 दरम्यान उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे अपघातात 13 हजार 984 जणांचा बळी गेल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. रेल्वे रूळ ओलांडताना, गाडीतून उतरताना फ्लॅटफाॅर्म आणि गाडीत पाय अडकून तसेच इतर कारणांमुळे झालेल्या अपघातांमध्ये हे बळी गेले आहेत.
वॉचडॉग फाऊंडेशनने माहिती अधिकाराखाली पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडे 2012 ते 2016 दरम्यानच्या रेल्वे अपघातातील बळींची आणि त्यांना मिळालेल्या मोबदल्याची माहिती मागितली होती. त्यानुसार ही माहिती समोर आली आहे. शिवाय रेल्वे अपघातांसाठी प्रवासीही काही प्रमाणात जबाबदार असतात हेही समोर आले आहे. रेल्वे अपघातात हजारो बळी जात असतानाही रेल्वे प्रवाशांचे डोळे काही उघडत नसल्याचे चित्र आहे. कारण गेल्या पाच वर्षात 53 हजार 329 प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडताना पकडण्यात आल्याची माहितीही माहिती अधिकाराखाली समोर आली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील अपघातातील बळींची आकडेवारी
वर्षे | बळींची संख्या |
2012 | 604 |
2013 | 541 |
2014 | 578 |
2015 | 541 |
2016 | 631 |
एकूण बळी | 2895 |
मध्य रेल्वे मार्गावरील अपघातांच्या बळींची आकडेवारी
वर्षे | बळींची संख्या | रेल्वेकडून देण्यात आलेला मोबदला |
2012 | 2297 | 21 कोटी 37 लाख |
2013 | 2270 | 9 कोटी 60 लाख |
2014 | 2221 | 3 कोटी 82 लाख |
2015 | 2187 | 12 कोटी 26 लाख |
2016 | 2114 | 5 कोटी 29 लाख |
एकूण बळी | 11,089 | 52 कोटी 34 लाख |
रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई
वर्षे | रुळ ओलांडणारे प्रवासी | दंड |
2012 | 11250 | 5300416 |
2013 | 8084 | 3760960 |
2014 | 9923 | 5022790 |
2015 | 12403 | 5291850 |
2016 | 11669 | 4657805 |
एकूण | 53,329 | 24,03,3,821 |
वाढते रेल्वे अपघात आणि त्यात जाणाऱ्या बळींची संख्या, ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनानं आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. यावर रेल्वेने उपाययोजना केल्या पाहिजेत. जेणेकरून अपघात रोखले जातील. - निकोलस आल्मेडा, ट्रस्टी, वॉचडॉग फाऊंडेशन
रेल्वे अपघातांची आणि त्यातील बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रेल्वेतील अपघात रोखण्यासाठी, ठोस उपाययोजना कराव्यात यासाठी आम्ही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत. पण प्रशासन काही केल्या त्याकडे लक्षच देताना दिसत नाही. रेल्वे प्लॅटफॉर्मच्या उंचीचा प्रश्नही जैसे थे आहे. 70 लाख प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना रेल्वे प्रशासन मात्र उदासीन दिसते. त्यामुळेच आता प्रवाशांनीच पुढे येत हे चित्र बदलण्यास प्रशासनाला भाग पाडणं गरजेचं आहे आणि ते आम्ही करूच.
- शैलेंद्र कांबळे, निमंत्रक, प्रवास अधिकार आंदोलन समिती