Advertisement

बीडीडी पुनर्विकासात कोण मारणार बाजी?


बीडीडी पुनर्विकासात कोण मारणार बाजी?
SHARES

मुंबई - नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे केवळ दोनच निविदा सादर झाल्या आहेत. त्यानुसार या दोन निविदांची तांत्रिक छाननी मंडळानं केली असून, लवकरच निविदा अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. सादर झालेल्या निविदांमध्ये शापुरजी-पालमजी आणि एल अॅण्ड टी या दोन बिल्डरांचा समावेश आहे. त्यामुळे बाजी कोण मारणार? शापुरजी-पालमजी की एल अॅण्ड टी याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

धारावी पुनर्विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढण्यात आल्या. पण या निविदेला प्रतिसादच मिळत नसल्याने हा पुनर्विकास रखडला आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासाची वाटही धारावी पुनर्विकासाच्या दिशेनेच जात होती. कारण बीडीडीसाठीही निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने तीनदा मुदतवाढ देण्यात आली. मात्र अखेर दोन का होईना पण निविदा सादर झाल्याने आता या दोन कंपन्यांमधून एकाची निवड केली जाणार आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून, 24 मार्चला आर्थिक निविदा खुल्या केल्या जाणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे. या दोनपैकी एका कंपनीची निवड करत यासंबंधीचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार ही समिती निविदा अंतिम करणार आहे. त्यामुळे आता काही दिवसांतच बीडीडीचा पुनर्विकास कोणाच्या हाती जाणार हे स्पष्ट होणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा