Advertisement

तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा 'मुंबई पुणे मुंबई' हा पहिला मराठी चित्रपट


तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा 'मुंबई पुणे मुंबई' हा पहिला मराठी चित्रपट
SHARES

जवळजवळ आठ वर्षांपूर्वी 'मुंबई पुणे मुंबई' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरडूपर हिट ठरला. या चित्रपटाचा पुढचा भाग 'मुंबई पुणे मुंबई-२' तीन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही यशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आता 'मुंबई पुणे मुंबई-३'च्या रूपात या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. मराठीत तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा 'मुंबई पुणे मुंबई' हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.



मराठीतील हा पहिलाच प्रयत्न

दोन भागांना मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक सतीश राजवाडे 'मुंबई पुणे मुंबई-३' हा या चित्रपटाचा तिसरा भाग घेऊन आला आहे. तिसऱ्या भागाची निर्मिती करण्याचा मराठीतील हा पहिलाच प्रयत्न असून या बहुप्रतिशिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री मुक्ता बर्वे, दिग्दर्शक सतीश राजवाडे, चित्रपटाचे निर्माते व एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे संजय छाब्रिया, सहनिर्माते व ५२ फ्रायडे सिनेमाजचे अमित भानुशाली आणि इरॉस इंटरनॅशनलचे नंदू आहुजा उपस्थित होते.


यांच्या आयुष्यात येणार नवीन पाहुणा

एकमेकांशी सतत भांडणाऱ्या या जोडीच्या संसारवेलीवर एक गोंडस फुल उमलणार आहे आणि हिच गोष्ट 'मुंबई- पुणे- मुंबई ३'मध्ये पाहायला मिळणार आहे. करिअरला प्राधान्य देत संसाराचा गाडा सांभाळणाऱ्या गौरी-गौतमच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार म्हटल्यावर दोन्ही घरात एकच गडबड गोंधळ सुरू होतो, अशी साधारण हलकीफुलकी कहाणी 'मुंबई- पुणे- मुंबई ३'मध्ये पाहायला मिळणार आहे. 'मुंबई पुणे मुंबई-३' या चित्रपटात स्वप्नील व मुक्ता या लोकप्रिय जोडीने रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडतं हे पाहण्याची उत्कंठा सिनेरसिकांनाही लागून राहिली आहे.


'यांच्या' महत्त्वाच्या भूमिका

यात स्वप्नील-मुक्ताच्या जोडीला रोहिणी हट्टंगडी, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, सुहास जोशी, मंगल केंकरे आणि विजय केंकरे यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे आणि पल्लवी राजवाडे यांचे आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणं प्रदर्शित झाल्यानं या जोडीच्या पुढील प्रवासाचा अंदाज रसिकांना आला असला, तरी तो प्रत्यक्ष पाहण्याची मजा काही औरच असेल आणि त्याचमुळे उत्कंठा वाढली आहे.


प्रेमकथेचा एक वेगळा बाज

याबाबत सतीश म्हणाला की, 'मुंबई पुणे मुंबई'ला एवढं यश मिळेल असं आम्हाला सुरुवातीला वाटलंच नव्हतं. 'मुंबई पुणे मुंबई' हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून, प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. आता लोकांना गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडतं आहे, त्याबद्दल जिज्ञासा लागलेली असते.

या जोडप्याच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यांचा संबंध लोक आपल्या आयुष्याशी जोडू लागले आहेत. 'मुंबई पुणे मुंबई'चं चित्रीकरण करताना या चित्रपटाचा पुढचा भाग येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. पण दुसऱ्या भागाचं चित्रीकरण करताना या चित्रपटाच्या पुढच्या भागालाही वाव असल्याचं मात्र स्पष्टपणे जाणवलं होतं असंही सतीश म्हणाला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा