Advertisement

'जनतेचे प्रश्न सोडवण्यात सरकार अयशस्वी'


'जनतेचे प्रश्न सोडवण्यात सरकार अयशस्वी'
SHARES

कुरारगाव - भाजप सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरलंय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय. सरकार सत्तेवर येण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन येतील असं म्हटलं होतं. मात्र अच्छे दिनचं हाडूक सरकारच्या गळ्यात अडकलंय, असं खुद्द भाजपचे मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं. त्यावरून हे सिद्ध होतं की, भाजप सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलंय, असे पवार म्हणाले. मालाड पूर्वेकडील कुरार येथील मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते.

महिला अत्याचार रोखण्याचं आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस करतात. मात्र या सरकारनं पोलिसांना मोकळीक न देता सर्वत्र हस्तक्षेप सुरू केलाय, असं सांगून गुन्हेगारांचं स्वागत खुद्द मुख्यमंत्री करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे 2 वर्षांत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय. अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे सांगितलं. मुस्लिमांचं आरक्षण, 4 हजार शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या यावरही पवार यांनी सरकारवर तोंडसुख घेतलं. फायद्यासाठी कचरा प्रश्न पेटवला जातोय. भाजप कार्यकर्त्यांनी एकतरी महापालिका पिंपरी-चिंचवडसारखी करून दाखवावी, असं आव्हानच त्यांनी दिलं. जय भवानी जय शिवाजीच्या नावावर खंडणी उचलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

देशाचा पंतप्रधान हा जिओ कंपनीचा प्रचारमंत्री झालाय, अशी टीका मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली. सरकारनं काळा धन आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते न करता चड्डी बनियान आणण्याचं काम केलं. या सरकारनं सर्वसामान्य जनतेचं भलं न करता रामदेवबाबांचं कल्याण केलं. पतंजलीचं उत्पन्न 5 हजार कोटींपेक्षा जास्त केलं. नालेसफाई, टॅब, रस्ते व डम्पिंग ग्राउंडचा घोटाळा शिवसेनेनं करवून दाखवल्याची टीकाही त्यांनी केली.

या मेळाव्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवाब मलिक, खासदार माजिद मेनन, महिला अध्यक्षा चित्रा वाघ आदीही उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा