भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना शुक्रवारपासून पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं आहे. तर दुसरीकडे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांकडून सुरू आहे. मुंबईतून जवळपास ४०० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर मुंबईबाहेरील, मुंबईत आझाद यांच्या सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी रोखत ताब्यात घेतलं आहे.
आझाद यांना नजरकैदेत ठेवून २४ तास उलटले तरी त्यांची सुटका झालेली नाही. त्यामुळे भीम आर्मीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. पोलिसांना चकवा देत काही कार्यकर्ते मालाडच्या मनाली हॉटेल इथं पोहोचत सरकार विरोधात घोषणा बाजी करत आहेत. पोलिसांकडून या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं जात आहे.
चंद्रशेखर आझाद शुक्रवारी दुपारपासून मालाडच्या मनाली हॉटेल इथं नजरकैदेत आहेत. त्यांच्या मुंबईसह पुणे, लातूर आणि अमरावतीच्या सभा रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, भीम आर्मीचे मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे यापुढं भीम आर्मीची नेमकी भूमिका काय असणार हे स्पष्ट होताना दिसत नाही. मनाली हॉटेलबाहेर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे .तर ह्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
राष्ट्रवादीचे अामदार जिंतेंद्र आव्हाड यांनी दुपारी आझाद यांची भेट घेतली. आपल्याला पोलिसांनी का नजरकैदेत ठेवलं आहे हाच प्रश्न आहे. पण आपण संविधानाच्या मार्गानं चालणारे आहोत. त्यामुळे पोलिसांना जे करायचे आहे ते पोलिसांनी करावं याचं उत्तर २०१९ ला जनता देईल, असा इशारा आझाद यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. बंद सभागृहात आझाद यांची सभा होईल अशी शक्यता होती. मात्र ती शक्यता ही आता मावळली आहे. आता आझाद यांना पोलीस नजरकैदेतून कधी बाहेर काढणार हाच आता प्रश्न आहे.