महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतल्यापासून राज ठाकरे आणि भाजपमधील जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असा अनेकांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी रविवारी सकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे.
यापूर्वीही मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनाची तयारी सुरु असताना आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ही भेट वैयक्तिक स्वरुपाची असल्याचे त्यावेळी शेलार यांनी स्पष्ट केले होते. यानंतर रविवारी आशिष शेलार यांनी थेट राज ठाकरे यांचे कृष्णकुंज निवासस्थान गाठले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा सुरु होती. त्यामुळे भाजप आणि मनसे युतीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.
२०२२ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकासआघाडी एकत्रपणे लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी जड जाऊ शकते. त्यामुळे भाजपकडून मनसेशी हातमिळवणी केली जाऊ शकते. राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या सभेत नागरिकत्व सुधारण कायद्यावरून (CAA) केंद्र सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. तसेच पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती. या गोष्टी भाजपला पूरक असल्याने दोन्ही पक्षांची युती होण्याची दाट शक्यता आहे.
मागील काळात ७ जानेवारीला भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात मुंबईत गुप्त बैठक झाली होती. प्रभादेवी येथील’ इंडिया बुल्स स्काय’ या हॉटेलमध्ये जवळपास तास- दीड तास ही भेट झाली होती. देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणं जुळताना दिसत आहेत. या भेटीनंतर राज ठाकरे हॉटेलच्या मागच्या गेटने बाहेर पडले. ही भेट अत्यंत गोपनीय होती. जवळपास १ ते दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मित्र गुरुप्रसाद रेगे हे देवेंद्र फडणवीस यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली आले होते.