दिवाळी पाडव्यापासून म्हणजे सोमवार १६ नोव्हेंबरपासून राज्यभरातील धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय ठाकरे सरकारने नुकताच घेतला आहे. हा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण, असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
या संदर्भात वक्तव्य करताना प्रवीण दरेकर म्हणाले, उशीरा का होईना, पण या सरकारला शहाणपण सुचलं. राज्यभरातील लाखो वारकरी, मंदिरांवर अवलंबून असलेले व्यावसायिक आणि हिंदुत्ववाद्यांच्या दबावापुढं झुकून राज्य सरकारला धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला. खरं म्हणजे हा निर्णय अगोदरच व्हायला हवा होता. कारण मंडई असेल, माॅल असतील, अगदी रेस्टाॅरंट-बार असतील, जीम असतील आणि इतर गर्दीची सार्वजनिक स्थळं आपण मोकळी केलेली असताना धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय अहंकारातून घेण्यात आला होता.
वारकरी संप्रदाय असू दे किंवा हिंदुत्वाच्या भूमिकेतून भाजप धार्मिक स्थळं सुरू करण्याची मागणी करत असूनही सरकार केवळ अहंकारापोटी निर्णय घेत नव्हतं. परंतु उशीरा हा होईना सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. यामुळे कोरोना संकटात सर्व नियमांचं पालन करून भाविकांना आपापल्या देवी-देवतांची उपासना करता येईल आणि धार्मिक स्थळांवर अवलंबून व्यावसायिकांची उपासमारही थांबेल, असंही प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा - ठाकरे सरकारची मोठी घोषणा, पाडव्यापासून खुलणार सर्व धार्मिक स्थळं
मंदिरे उघडण्याच्या निर्णयाचे स्वागत; परंतु राज्य सरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण. @CMOMaharashtra pic.twitter.com/2sVQe2KrRa
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) November 14, 2020
दरम्यान, पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावंच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे मागील ७-८ महिन्यांपासून राज्यातील धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात आली होती. सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत विविध सेवा-सुविधा अनलाॅक केल्या असल्या, तरी धार्मिक स्थळं आतापर्यंत बंदच ठेवण्यात आली होती. यावरून राज्यात चांगलंच राजकारण रंगलं होतं. भाजप, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, रिपब्लिकन पक्षाने यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीवर आंदोलन, निर्दशने करून दबाव निर्माण केला होता. तरीही मुख्यमंत्र्यांनी या दबावापुढे न झुकता आपला निर्णय कायम ठेवला होता.
(bjp leader pravin darekar reaction on temple and religious places reopening in maharashtra)