महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धोका वाढला आहे. पुण्यापाठोपाठ (Pune) मुंबईतही (Mumbai) आता कोरोना धडकला आहे. मुंबईत कोरोनाव्हायरसचे २ रुग्ण सापडलेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पण यात अफवांचा बाजार अधिक तापला आहे. सोशल मीडियावर मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.
कोरोनामुळे सध्या सर्वत्र भितीचं वातावरण आहे. पण यात आता अधिक अफवा देखील पसरवल्या जात आहेत. नुकतीच अशीच एक बातमी समोर आली आहे. मुलुंडमध्ये ५ जणांना कोरोना झाल्याची एकच अफवा सोशल मीडियावर पसरली. मुलुंड विभागातील ५ रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याचा मेसेज सोशल मीडियावर वायरल झाला. त्यानंतर नागरिकांमध्ये आणखीनच भिती पसरली.
पण मिहिर कोटेचा यांनी ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं. यासंदर्भात त्यांनी एक परीपत्रक काढलं. सोशल मिडियावर सातत्यानं एक अफवा पसरवली जातेय की, मुलुंड विभागातील ५ रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. याबाबत मी तातडीनं मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली. वरील बातमी खोटी असून माझी सर्व मुलुंडवासियांना विनंती आहे की, घाबरून जाऊ नका, खबरदारीचे उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असं या परिपत्रकात त्यांनी म्हटलंय.
सध्या मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba hospital) कोरोनाव्हायरसच्या संशयित रुग्णांना दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी २ जणांना कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं आहे. दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढून १४ वर गेला आहे.
असं असलं तरी मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये. स्वच्छतेची योग्य काळजी घेतली तर घाबरण्याचं काही एक कारण नाही.
हेही वाचा