महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हिंदी भाषिकांविरोधातील वादग्रस्त वक्तव्याला आता राजकीय वळण लागले आहे. राज ठाकरे यांनी अलीकडेच शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या विजयी मेळाव्यात हिंदी भाषिकांवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "मारा, पण व्हिडीओ काढू नका."
त्यांच्या या विधानावरून देशभरातून टीका होत असतानाच आता भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी थेट प्रत्युत्तर देत कठोर भाषेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
आमच्या पैशांवर जगताय, हिंमत असेल तर बाहेर या, आपटून आपटून मारू, असं वादग्रस्त वक्तव्य खा. दुबे यांनी केलं आहे.
गुवाहाटीतील एका कार्यक्रमात बोलताना निशिकांत दुबे म्हणाले की, "महाराष्ट्रात आहे काय? कोणता उद्योग आहे? आमच्याकडे खाणी आहेत. रिलायन्सने रिफायनरी गुजरातमध्ये टाकलीय. सेमीकंडक्टरचा उद्योग गुजरातमध्ये येतोय. तुमच्याकडे काय आहे? आमच्या पैशावर जगताय, आमची भाकरी खाताय, आमचे शोषण करून टॅक्स देताय आणि वर आमच्यावरच दंडेली करताय."
ते पुढे म्हणाले, "जर हिंमत असेल, आणि हिंदी बोलणाऱ्यांना मारायचंच असेल, तर मग उर्दू, तमिळ आणि तेलुगू बोलणाऱ्यांनाही मारा. एवढेच धाडसी असाल तर महाराष्ट्राच्या बाहेर या. बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये या. ‘तुम्हाला आपटून आपटून मारू."
ते पुढे म्हणाले, "आम्ही मराठी भाषेला आणि महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिकांना आदर देतो, पण मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज आणि उद्धव ठाकरे सस्ती राजनीती करत आहेत. जर खरोखर हिंमत असेल, तर महिम दरग्याजवळ जा आणि हिंदी किंवा उर्दू बोलणाऱ्यांना तिथं मारा."
राज ठाकरे यांचे हे विधान मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन केले गेले असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या विधानामुळे महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये असंतोषाची भावना वाढत आहे. विशेषतः उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय समुदायातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा