राज्यभरात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्व पक्षीय नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा, आयुक्त अशोक लवासा व सुशीलचंद्र मंगळवारी मुंबईत येणार आहेत. आयोगाच्या वतीनं मंगळवारी व बुधवारी सलग २ दिवस बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.
राज्य विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार, याकडं आता सर्वाचंच लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं मंत्रालयातही अधिकारी-कर्मचाऱ्यांची लगबग सुरू आहे. तसंच, मंत्रालयात कामं घेऊन येणाऱ्यांची संख्याही नेहमीपेक्षा अधिक वाढली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त व अन्य दोन आयुक्त मुंबईत येऊन २ दिवस संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीची माहिती घेणार आहेत. गृहविभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांचीही बैठक घेऊन निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाणार आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निर्भय व शांततेच्या वातावरणात कशी पार पाडली जाणार, याबाबतचा आढावा घेतला जाणार आहे.
हेही वाचा -
सायन रुग्णालय पुनर्विकासाच्या प्रस्तावात तांत्रिक उणिवा, स्थायी समितीचा दावा
पावसाचं पाणी साठवण्यासाठी महापालिका करणार भूमिगत जलबोगदे