'सबका साथ सबका विकास' या धर्तीवर उल्हासनगर शहराचा विकास होणार आहे. हे शहर सुंदर बनवण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार असून त्यासाठी 300 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
याचसोबत कल्याण अंबरनाथ रस्ता रुंदीकरणात बाधीत झालेल्यांच्या विस्थापनाचा प्रश्न एक महिन्यात मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
उल्हासनगर रेल्वेस्थानक परिसरात वाहनतळ आणि व्यापारी संकुलासाठी महानगरपालिकेची जागा उपलब्ध आहे. हे वाहनतळ आणि संकुल उभारण्यासाठी राज्यशासनामार्फत निधी देण्याचा प्राधान्याने विचार करण्यात येईल. तसेच उल्हासनगर शहराचा विकास आराखडा बनवण्यासाठी विशेष तरतूद करण्यात यावी. उल्हासनगर महानगरपालिकेस रस्ते, पायाभूत सुविधांसाठी अनुदान देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना केल्या.
उल्हासनगर, अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर या शहरांतील घनकचरा व्यवस्थापनासाठी उसाटणे येथील भूखंडावर मुंबई महानगर प्राधिकरण प्रदेश विकास महामंडळाने संयुक्तरित्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारावा. याचसोबत मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानसाठी तातडीने जागेची व्यवस्था करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.