मुंबईहून सूरतला निघालेल्या ३ प्रवाशांची पालघर येथील जमावाने चोर समजून हत्या (palghar mob mob lynching) केली होती. या घटनेतील १०१ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची राज्य सरकारनेही गंभीर दखल घेतली असून या गुन्ह्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा देण्यात येईल, असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
दाभाडी-खानवेल मार्गावरून ३ जण कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला आणि त्यांना दगडाने ठेचून मारलं. ही घटना पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले इथं घडली होती.
हेही वाचा - पालघरमध्ये चोर समजून तिघांची दगडानं ठेचून हत्या
या घटनेची माहिती मिळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरीही होते. या सर्वांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने शांत होण्याऐवजी पोलिसांच्या गाडीवरही हल्ला करत दगडफेक केली. यामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती.
The Palghar incident has been acted upon. The police has arrested all those accused who attacked the 2 sadhus, 1 driver and the police personnel, on the day of the crime itself.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 19, 2020
हे प्रकरण माध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच मुख्यमंत्र्यांनी त्यावर खुलासा केला. पालघर इथं घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
हेही वाचा - 'त्या' मनिपूरी तरुणीवर थूंकणाऱ्याला अखेर अटक
सामाजिक/जातीय तेढ नको
तर, पालघर येथील हत्येची राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन हल्ल्यात सामील १०१ जणांना अटक केली गेली आहे तसंच या घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. या घनेवर वाद निर्माण करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतंय का, यावरही सरकार लक्ष ठेऊन असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.