Advertisement

केंद्राकडे मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याची सातत्याने मागणी- उद्धव ठाकरे

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित प्रमाणात लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याची मागणी आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे करत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

केंद्राकडे मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याची सातत्याने मागणी- उद्धव ठाकरे
SHARES

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित प्रमाणात लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याची मागणी आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे करत आहोत. केंद्राने याचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवार १० जून २०२० रोजी विधानभवन परिसरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयी प्रश्न विचारण्यात आला.

बेस्टची सेवा

मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयीची माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्याच्या स्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी बेस्ट सेवा जात आहे. खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही बेस्टची सेवा दिली जात आहे. परंतु बेस्टची सेवा पूर्ण क्षमतेने चालवली जात नाहीय. हे लक्षात घेतलं पाहिजे. राज्य सरकार स्थितीचा अंदाज घेऊन पाऊल टाकत आहे. त्यामुळे कुणीही घाई करू नये, गर्दी टाळावी, असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

हेही वाचा- लॉकडाऊनमुळं मुंबई लोकलला 'इतक्या' कोटींचा तोटा

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी

एका बाजूला बेस्ट सेवा मर्यादित क्षमतेने चालवली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला लोकल ट्रेन सेवा चालवली जात नाहीय. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी मर्यादित लोकलसेवा सुरू करण्याची मागणी आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे करत आहोत. केंद्राने याचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी केल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

लाॅकडाऊनमध्ये शिथिलता

 लाॅकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत खासगी कार्यालयं १० टक्के मनुष्यबळासह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. दुकाने, बाजारपेठा सम-विषम पद्धतीने पूर्ण क्षमतेने चालवण्यास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे. व्यवसाय, उद्योगधंदे चालवणारे, नोकरदार, कर्मचाऱ्यांना आपल्या कामाधंद्याच्या ठिकाणी जाणं-येणं सोईचं व्हावं म्हणून मुंबई महानगर परिसरात प्रवासाला देखील मुभा देण्यात आली आहे. 

कोरोनाचा धोका

मात्र सरकारने लाॅकडाऊन शिथिल करताच रस्त्यांवर पुन्हा एकदा गर्दी होताना दिसू लागली आहे. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन होत आहे. बेस्ट बसमध्ये पूर्वीइतकीच रेटारेटी सुरू आहे. बहुतेक जण खासगी वाहनांनी आपापल्या कार्यालय, व्यवसायाकडे जात असल्याने रस्त्यावरही वाहतूककोंडी होऊ लागली आहे. अशा स्थितीत कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आणखी वाढल्याचं म्हटलं जात आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा