Advertisement

मास्क न घातल्याबद्दल राज ठाकरेंनी दिलं ‘हे’ भन्नाट उत्तर

राज ठाकरे हे मास्क न घालताच मंत्रालयात पोहोचल्याने सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. याबाबत त्यांना विचारलं असता आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांनी मिश्कील उत्तर दिलं.

मास्क न घातल्याबद्दल राज ठाकरेंनी दिलं ‘हे’ भन्नाट उत्तर
SHARES

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी दुपारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. मंत्रालयामध्ये दुपारी अडीचच्या सुमारास सुरू झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील सहभागी झाले होते. परंतु राज ठाकरे हे मास्क न घालताच मंत्रालयात पोहोचल्याने सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. याबाबत त्यांना विचारलं असता आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांनी मिश्कील उत्तर दिलं.

प्रमुख नेत्यांशी संवाद

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १० हजारांच्या पुढं गेला आहे. राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचं सहकार्य महत्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वपक्षीय नेत्यांसोबत संवाद साधत आहेत. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी दुपारी राज्यातील राज्यातील १८ प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. 

हेही वाचा - राज ठाकरे बिना मास्कचेच मंत्रालयात… कारण काय?

कुणाचा समावेश?

यामध्ये विरोधी पक्ष नते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे , वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, महादेव जानकर, जयंत पाटील, इम्तियाज जलील, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई या नेत्यांचा समावेश आहे. तर या बैठकीत राज्य सरकारकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील सहभागी झाले होते. 

दिलं हे उत्तर

या बैठकीला उपस्थित सर्व राजकीय नेत्यांनी मास्क घातलेला होता. तर राज ठाकरे यांनी आपल्याकडील मास्क टेबलवरच ठेवला होता. मास्क का घातला नाही, याबाबत राज ठाकरे यांना विचारणा केली असता, सगळ्यांनी घातला म्हणून नाही घातला, असं मश्कील उत्तर हसत हसत दिलं.  

हेही वाचा- महाराष्ट्रावर संकट येताच परप्रांतीय पळ काढतात, आपल्या मराठी तरूणांना संधी द्या- राज ठाकरे

नियम मोडला?

राज्यात कोरोनानं थैमान घातलं असताना कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं मुंबई महापालिकेने बंधनकारक केलं आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास १ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद केली आहे. अशा रितीने मास्क न घातल्याबद्दल आतापर्यंत हजारो लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे राज यांच्याकडून या नियमाचं उल्लंघन झाल्याचंही म्हटलं जात आहे. 

दरम्यान या, बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अनेक मुद्यांना हात घातला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा