स्वत: काळजी घेतल्यास, शारीरिक स्वच्छता राखल्यास आणि सोशल डिन्स्टन्सिंगसारख्या शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचं पालन केल्यास आपण कोरोनावर निश्चितपणे मात करू शकतो. त्यामुळे कोरोनाला घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या वॉर रूमला अजित पवार यांनी भेट दिली. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
कोरोनाचं संकट असल्यामुळे आपल्या सगळ्यांना नाईलाजाने घरातच बसावं लागलं आहे. जवळपास मार्च अर्धा आणि एप्रिल-मे पूर्ण असे अडीच महिने आपण लाॅकडाऊनच्या नियमांचं पालन केलं, त्याबद्दल सर्वांचं कौतुक केलं पाहिजे. परंतु काही थोडे लोकं जे नियमांचं पालन करत नाहीत, त्यांच्यामुळे थोडाफार त्रास सहन करावा लागतोय. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झाल्यास मुंबई, औरंगाबाद, मालेगाव, पुणे, काही प्रमाणात पिंपरी-चिंचवड इथं कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसून येतेय.
संपूर्ण राज्य 'कोरोना' विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठींबा मिळत असून सामुहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू, असा ठाम विश्वास मा. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांनी व्यक्त केला. @AjitPawarSpeaks #LetsFightCorona pic.twitter.com/F5xoDXyRnk
— NCP (@NCPspeaks) May 29, 2020
तरी माझी सगळ्यांना विनंती आहे की कोरोनाला घाबरून जाऊ नका. आपण सगळ्यांनी स्वच्छतेबाबतची काळजी घेतली, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं. तर निश्चितपणे या संकटातून आपण सहिसलामत बाहेर पडू शकतो. केंद्र, राज्य सरकार आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीत कुणीही राजकारण करू नये, सध्याच्या स्थितीत माणसांना आधार देणं, त्यांना या संकटातून बाहेर काढणं, परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी हातभार लावण्याची खरी गरज आहे.
रेड झोनमध्ये उद्योगधंदे सुरू करण्याची मागणी होत होती, त्याची आपण दखल घेत आहोत. परंतु परप्रांतीय आपापल्या घरी निघून गेल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेले नाही. परंतु लवकरच ते पूर्वपदावर येतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे डाॅक्टर, नर्स, वैद्यकीय अधिकारी, पोलीस, महापालिका प्रशासनाला सहकार्य करा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.