भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. याच पार्श्वभूमीवर बुधवारी भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. यावेळी बंदच्या दरम्यान मुंबई आणि ठाण्यासह संपूर्ण राज्यात आंबेडकर अनुयायी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले.
यावेळी रेल रोको, रास्ता रोको आणि निदर्शने करण्यात आली. सकाळी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला दुपारी १२ नंतर मात्र हिंसक वळण लागलं. दरम्यान भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा कट रचणाऱ्या मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. पण गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक झाली नसल्यामुळे आंबेडकरी अनुयायांचा संताप आणखीनच वाढला आणि त्यांनी ठिकठिकाणी बसेसची तोडफोड करत काही ठिकाणी जाळपोळही केली.
अॅड प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी दुपारी ४ नंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हा बंद मागे घेतल्याची घोषणा केली. हा बंद शांततेत पार पडला असा दावा जरी प्रकाश आंबेडकर यांनी केला असला तरी लोकांच्या गाड्यांचं, सरकारी मालमत्तेच बरंच नुकसान झालं होतं. संपूर्ण राज्याला आणि मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या या बंदबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या बंदची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणारे अॅड. प्रकाश आंबेडकर या सर्व प्रश्नांची उत्तरं गुरुवारी दुपारी १ वाजता 'मुंबई लाइव्ह'च्या फेसबुक पेजवरून देणार आहेत.