नाशिक ते मुंबई अशी पायपीट करत किसान रॅली मोर्चा सोमवारी पहाटे मुंबईत दाखल झाला. पण, या मोर्चात विनाचप्पल चालून अनेक शेतकऱ्यांच्या पायाला दुखापत झाली. यापैकीच एक म्हणजे सखुबाई. या वृद्ध आजींच्या पायाला गंभीर दुखापत होऊनही त्या मोर्चा सोडून जाण्यास तयार नाहीत. पायाच्या जखमेपेक्षा फसव्या आश्वासनांमुळे मनाला झालेली जखम मोठी असल्याचं त्यांनी सांगितलं.
या आजींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणं आवश्यक असल्याचं डाॅक्टरांनी सांगूनही त्या मोर्चा सोडून जायला तयार नाहीत. माझी हक्काची जमीन मला मिळावी आणि माझ्या सारख्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मी शेवटपर्यंत इथंच थांबणार आहे, असा निर्धार त्यांनी केला आहे.
पहाटे ५ वाजता शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानात दाखल झाला. या रखरखत्या उन्हातून चालल्यामुळे अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास झाला. शिवाय, जुलाब, डोकेदुखी, अंगदुखी याचाही त्रास शेतकऱ्यांना झाला.
सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत ७०० आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर उपचार करण्यात आले. तर, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी तिघांना जे. जे. रुग्णालय आणि एकाला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी शेतकऱ्यांवर उपचार केल्याची माहिती ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे डॉ. संजय वाठोरे यांनी दिली. या रुग्णवाहिकेत ४ डॉक्टर आणि ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा-
शेतकरी मोर्चा पूनम महाजनांना शहरी माओवाद वाटतोय!
'शेतकरी मोर्चेकऱ्यांसाठी विशेष ट्रेनची सोय करा'
नाहीतर, शेतकऱ्यांच्या रागाचा वणवा देशभर पसरेल- शरद पवार