सोलापूरमधील बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मंत्रालयाच्या गेटबाहेर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. शेतकरी कर्जमाफी, शेत मालाला हमी भाव आणि तूरडाळ खरेदीसाठी संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
एकीकडे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारला इशारा देण्यासाठी अशा प्रकारे आंदोलन केल्याचे संजय पाटील यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितले. या आंदोलनामुळे मंत्रालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.