अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकर्यांना दिलासा देणारी घोषणा केली. शेतकर्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्याला उद्या सोमवारपासून सुरुवात होत असून, अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या दिवशी पहिली यादी जाहीर होईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार विरोधकांना नाही, तर जनतेसाठी बांधिल आहे. मात्र, सरकार स्थिर झाले आहे. काम करत आहे यामुळे विरोधकांना पोटदुखी होत आहे. महाविकास आघाडीने शेतकर्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची वचनपूर्ती उद्या होत आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी जाहीर होईल. तीन महिन्या या योजनेची प्रक्रिया पूर्ण होईल. सोमवारची यादी शेवटची नसेल. टप्प्याटप्प्यानं याद्या जाहीर केल्या जातील. सरकारने केलेल्या नियोजनाप्रमाणे सुरूवातीला प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. एप्रिल अखेरपयर्ंत ही योजना पूर्ण होईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला
गेल्या काही दिवसात चांगले निर्णय घेतले आहेत. सर्व घटकातील जनतेला आधार देण्याच काम केलं आहे. सगळे विषय एका फटक्यात सोडवता येणार नाही. अचाट वाटावे म्हणून सुरू करायचं आणि पेलवंत नाही म्हणून उताणं पडायचं हे आमच्या सरकारला जमत नाही. नुसत्या घोषणा नाही, तर हे सरकार कामही करत आहे, असा टोला ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.