काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली असून यामध्ये महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांचं मात्र सातव्या यादीतही नाव नसल्यामुळं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
काँग्रेसनं जाहीर केलेल्या सातव्या यादीत औरंगाबादमधून सुभाष झांबड, जालन्यातून विलास औताडे, चंद्रपूरमधून विनायक बांगडे, भिवंडीतून सुरेश टावरे आणि लातूरमधून मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या याद्यांपैकी तीन याद्यांमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश होता. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांच्या नावाचा समावेश नव्हता.
अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. चव्हाण यांनी लोकसभेसाठी आपल्या पत्नी अनिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली होती. परंतु अशोक चव्हाण आणि सातव यांनी निवडणूक लढवावी असा काँग्रेसचा आग्रह आहे. तर दुसरीकडे संजय निरूपम हे उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र आतापर्यंत आलेल्या काँग्रेसच्या याद्यांमध्ये प्रमुख नेत्यांची नावं नाहीत.
२२ मार्च रोजी काँग्रेसनं जाहीर केलेल्या यादीत बदल करण्यात आले आहेत. आता राज बब्बर हे उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून लोकसभा निवडणूक लढवणार नसून ते फतेहपुर सिकरीमधून राज बब्बर निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या जागी कवि इम्रान प्रतापगढी निवडणूक लढवणार आहेत.
हेही वाचा -
राज्यात ४ हजार मतदान केंद्रांची वाढ
पालघर लोकसभेसाठी 'बविआ'ला 'माकप'ची साथ